Rishabh Pant: टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकिपर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातापासूनच तो मैदानापासून दूर आहे. चाहते मात्र आपल्या लाडक्या पंतला मैदानात खेळताना पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. अशातच ऋषभ पंतचे लेटेस्ट फिटनेस अपडेट समोर आले आहे. मात्र, या अपडेटमुळे चाहत्यांची निराशा होणार आहे. ताज्या अपडेटनुसार, ऋषभ पंत यंदाच्या विश्वचषकापर्यंत (World Cup 2023) पूर्णपणे तंदुरुस्त होणं अशक्य असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ऋषभला फिट अँड फाइन होऊन पुनरागमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच, ऋषभ यंदाच्या वर्षाअखेरीस होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची शक्यताही धूसरच असल्याचं या हेल्थ अपडेटवरुन स्पष्ट झालं आहे. 


क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंतला जवळपास एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागू शकतं. दरम्यान, एक चांगली गोष्ट आहे की, ऋषभ पंत पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप वेगानं बरा होत आहे. पण असं असूनही ऋषभ पंतला यष्टिरक्षक, फलंदाज म्हणून मैदानात उतरण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.


अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सप्टेंबर अखेरपर्यंत ऋषभ पंत फलंदाजीचा सराव सुरू करू शकतो. पंत सप्टेंबरपासूनच सराव सुरू करणार असल्यानं त्याला यंदाच्या आशिया चषक आणि विश्वचषकापासून दूर राहावं लागणार आहे. मात्र, ऋषभ पंत विकेटकीपिंगचा सराव कधीपर्यंत सुरू करू शकतो, हे डॉक्टरांनी अद्याप सांगितलेलं नाही.


विकेटकीपिंग सोडणार ऋषभ? 


अपघातानंतर ऋषभ पंत उपचार घेत आहे. बीसीसीआयनं ऋषभचा अपघात झाल्यानंतरच स्पष्ट केलं होतं की, टीम इंडियाच्या भविष्यातील वाटचालीसाठी पंत अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्या उपचारात कोणतीही कमी राहणार नाही. गरज भासल्यास पंतला उपचार आणि त्यानंतर प्रशिक्षणासाठी परदेशातही पाठवलं जाऊ शकतं, असं बीसीसीआयनं आधीच सांगितलं होतं. 


त्यामुळे उपचारानंतर तंदुरुस्त होऊन ऋषभ पंत केवळ फलंदाज म्हणून टीम इंडियात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतची फलंदाजीही टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. पंत पुढील वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे पंत विकेटकिपिंग सोडू शकतो, असं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ajinkya Rahane World Cup Team: श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, सूर्याचा फ्लॉप शो; वर्ल्डकपसाठीही टीम इंडियात अजिंक्य रहाणेची वर्णी?