लंडन : विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवामुळं आत्महत्या करावीशी वाटत होती, असं पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी म्हटलं आहे. ऑर्थर यांच्या या प्रतिक्रियेनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.


भारताविरुद्धचा पराभव हा पाकिस्तानसाठी खूपच धक्कादायक असल्याचं ऑर्थर यांनी म्हटले आहे. 16 जूनला मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं होतं. दक्षिण आफिक्रेविरुद्धच्या विजयामुळं पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अद्यापही जिवंत असल्याचं ऑर्थर यांनी सांगितलं आहे.


पाकिस्‍तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर संघाची स्तुती केली आहे. मात्र याचवेळी त्यांनी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटत होती, असेही बोलून दाखवले आहे.

ऑर्थर यांनी म्हटले आहे की, विश्वचषकात टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर आमचे सगळे खेळाडू थकले होते, या पराभवानंतर झालेल्या टीका, सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे सर्वजण दुःखी होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर लोकं टीमबद्दल चांगलं लिहितील. काही काळासाठी पाकिस्तानी टीमने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत आहेत, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे.  मात्र भारताकडून झालेल्या पराभवानंतर मी आत्महत्या करणार होतो, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या रेसमध्ये

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानी संघाने चांगली कामगिरी करत 49 धावांनी पराभव केला होता. आफ्रिकेविरुद्धच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा अजून जिवंत आहेत. पाकिस्तानी संघाने जर उरलेल्या तिन्ही लढती जिंकल्या आणि इंग्लंडचा संघ पराभूत झाला तर पाकिस्तान सेमीफायनलसाठी दावेदार ठरू शकतो. पाकिस्तानच्या संघाला उर्वरित लढतींमध्ये न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि बांगलादेशशी मुकाबला करायचा आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे 6 सामन्यांमध्ये 5 गुण झाले आहेत.