India vs Pakistan T20 World Cup 2007 Final : क्रिकेटच्या इतिहासात 24  सप्टेंबरचा दिवस चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहील. 2007 साली या दिवशी भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2007 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले होते. युवा खेळाडूने भरलेल्या टीम इंडियाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्येच सुरू झाला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. हा सामना देखील खास होता कारण टीम इंडियाने वर्ल्ड कपसारख्या मोठ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे हे पहिले विजेतेपद ठरले.


शेवटच्या षटकापर्यंत रंगला अंतिम सामना


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2007 चा अंतिम सामना रोमहर्षक होता. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 157 धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना गौतम गंभीरने अप्रतिम खेळी केली. अंतिम सामन्यात गंभीरने 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. गंभीरने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावांची वेगवान खेळी केली होती. रोहितने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला होता.






धोनीचा मास्टरमाइंड गेम


आता अंतिम सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानसमोर 158 धावांचे लक्ष्य होते. मात्र हे लक्ष्य गाठण्यात पाकिस्तानी संघ अपयशी ठरला. धोनीला खेळाचा मास्टरमाइंड मानला जात होता. जे अंतिम सामन्यातही पाहायला मिळाले. धोनीने शेवटच्या षटकात अशी फिल्डिंग लावली होती ज्यात पाकिस्तानचे फलंदाज अडकले होते. सामन्यातील शेवटचे षटक कर्णधार एमएस धोनीने जोगिंदर शर्माकडे दिले.


शेवटच्या षटकात जोगिंदरसमोर मिस्बाह उल हक फलंदाजी करत होता, एकेकाळी पाकिस्तान सामना जिंकेल असे वाटत होते, पण जोगिंदरने मिसबाहला आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्याचा झेल  श्रीशांतने घेतला. श्रीशांतचा हा झेल आयकॉनिक ठरला. हा झेल चाहते आजपर्यंत विसरू शकलेले नाहीत. हा झेल घेताच भारतीय संघ चॅम्पियन झाला.






भारताने 5 धावांनी जिंकला सामना


टीम इंडियाने अंतिम सामना 5 धावांनी जिंकला. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.3 षटकात 152 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना आरपी सिंग आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले. याशिवाय जोगिंदर शर्माने 2 आणि एस श्रीशांतने एक विकेट घेतली.


हे ही वाचा -


बांगलादेशला धक्का; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी दिग्गज खेळाडूला दुखापत