ICC ODI World Cup 2023 : भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. त्याला कारण आशिया चषक आणि विश्वचषक यजमानपद आहे. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.. तर विश्वचषक भारतात होत आहे. मागील 15 वर्षांपासून भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही... भारताने पाकिस्तानात यावे, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आहे.. भारत पाकिस्तानात आला तरच आम्ही विश्वचषकात सहभागी होऊ, असा सूर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आहे. भारत आपल्या मतावर ठाम आहे. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आशिया चषकासाठी जाणार नाही. आता पाकिस्तान बोर्डाने भारतात येण्यास तयार नसल्याचे सांगितलेय. यावरुन दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये सध्या तू तू मैं मैं सुरु आहे. आता अशातच शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानच्या संघाला भारतात जाण्याचा सल्ला दिलाय... आफ्रिदीचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

Continues below advertisement


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया कपसाठी हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यावरुनच शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चेअरमन नजीम सेठी यांच्या वक्तव्यावावर नाराजी व्यक्त केली आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ पाठवायला हवा, अशी भूमिका आफ्रिदीने घेतली आहे. भारतात होणारा विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान संघाने जायला हवे.. माघारी येताना त्यांनी विश्वचषक घेऊन यावा... हीच त्यांच्यासाठी चपराक असेल.. असा सल्ला आफ्रिदीने पाकिस्तान संघाला आणि नजम सेठी यांना दिलाय. भारतात जाऊन पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकल्यास एकप्रकारे बीसीसीआयला चपराक असेल, असे आफ्रिदी म्हणालाय. 


नजम सेठीला सुनावले - 


शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानी टीव्ही चॅनेल समा टिव्हीवर आपले मत व्यक्त केलेय. आफ्रिदी याने लाईव्ह नजम सेठी याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. पीसीबी चेअरमनपदाची आणि त्या खुर्चीचे महत्व अन् जबाबदारी समजायला हवी. प्रत्येकवेळा तुम्हाला आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल मुलाखत देण्याची गरज नाही, असे आफ्रिदी म्हणाला


भारतात जाऊन विश्वचषक जिंकावा -


आफ्रिदी म्हणाला की, आपल्या विधानावर ठाम असणाऱ्या व्यक्तीला पीसीबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करायला हवे. आताचे अध्यक्ष आपले वक्तव्य वारंवार बदलत आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट नाही.  आता एकदिवसीय विश्वचषकासंदर्भात आपला संघ भारतात न पाठवणं समजण्याच्या पलीकडचं आहे. क्रिकेट होत असेल तर आपला संघ पाठवायला हवा. मग तो भारतात असो किंवा इतर कुठेही. तिथे जाणे आणि ट्रॉफी जिंकून परत येण्यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, असे आफ्रिदी म्हणाला.