IndU19 vs AusU19, World Cup : भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. शेख रशिदनं 94 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदनं तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताला 50 षटकांत पाच बाद 290 धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालनं तीन आणि निशांत संधूनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.



भारतानं रचला ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर 


भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार यशसह शेख रशीदने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 291 धावाचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियातील अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात भारताला उत्तम गोलंदाजीचं दर्शन घडवावं लागणार होतं


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा कर्णधार यश धुलनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजीला आलेले सलामीवीर हरनूर सिंह आणि अंगक्रिश रघुवंशी हे खास कामगिरी करु शकले नाहीत. अंगक्रिश सहा तर हरनूर 16 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे 37 धावांवर भारताचे दोन गडी बाद झाले असताना कर्णधार यश आणि शेख रशीद यांनी भारताचा डाव सावरत अप्रतिम भागिदारी केली. यशने 110 चेंडूत 110 धावा केल्या तर यश मात्र शतकाच्या अगदी जवळ जाऊन 94 धावांवर बाद झाला. ज्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर 13 धावा करुन तंबूत परतला. अखेर दिनेश बाना (नाबाद 20) आणि निशांत सिंधू (नाबाद 12) यांनी 50 षटकापर्यंत क्रिजवर राहत 290 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 291 धावा करायच्या होत्या. 


ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव 


भारतानं समोर ठेवलेलं आव्हान गाठण्याच्या तयारीत मैदानात उतरलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फारशी चांगली खेळी करु शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा Teague Wyllie केवळ एक धाव काढत माघारी परतला. त्यानंतर Campbell Kellaway आणि Corey Miller यांनी 68 धावांची भागिदारी केली होती. Kellaway 30 आणि Miller 38 धावांवर बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर कर्णधार Cooper Connolly केवळ 3 धावा करुन माघारी परतला. Lachlan Shaw यांनी 51 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. Nivethan Radhakrishnan 11, William Salzmann 7 आणि Tobias Snell 4  धावा करत बाद झाले. त्यानंतर Jack Sinfield ने 20 आणि Tom Whitney ने 19 धावांची खेळी केली. 


अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास


भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha