Virat Kohli on Babar Azam: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अडीच वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. ज्यामुळं त्याच्या फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं. बाबर आझमच्या या ट्वीटला विराट कोहलीनं रिप्लाय दिलाय. 


नुकतंच बाबर आझमनं खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्वीट करत त्याची पाठराखण केली. या ट्वीटमध्ये त्यानं विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला. तसेच वाईट वेळ निघून जाईल असा पाठराखण करणारा मॅसेज लिहिला. याच ट्विटच्या रिप्लायमध्ये विराट कोहलीनं असं म्हटलंय की, "धन्यवाद! असाच चमकत राहा आणि पुढे जा, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा!"


विराट कोहलीचं ट्वीट- 



विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म
विराट कोहलीनं 2022 मध्ये 18 डावांमध्ये 25.50 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा आहे. कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही कोहली धावा काढण्यासाठी झगडत आहे. मागील अडीच वर्षात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलं नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून विराटला वगळलं
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडीजशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, टी-20 मालिकेसाठी भारतानं संघ जाहीर केलाय. यामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान मिळत का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 


हे देखील वाचा-