RP Singh on Team India's Batting Order: इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला 100 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आलीय. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच 17 जुलै 2022 रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंहनं (RP Singh) भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याचा सल्ला दिलाय. तसेच भारतीय संघात सूर्यकुमार यादवनं  (Suryakumar Yadav) कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी? हे देखील त्यानं सांगितलंय.


आरपी सिंह काय म्हणाला?
क्रिकबझशी बोलताना आरपी सिंह म्हणाला की, सुर्यकुमार यादवनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. विराट कोहली कर्णधार असताना संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करायचा. विराट कोहली नेहमी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यायचा. पण अनेक वेळा त्यानं केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं आहे. 


आरपी सिंहचं मत काय?
"तुमच्या संघातील कोणताही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर त्याला त्याच्या आवडत्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, फॉर्ममध्ये असलेला खेळाडू कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. परंतु, याला मी सहमत नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे. प्रत्येक खेळाडूला आपपल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची सवय झाली असते. तसेच तो फलंदाजीसाठी क्रिजवर येतो, तेव्हा चेंडूची स्थिती कशी असते, यालाही महत्व असते."


चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची चमकदार कामगिरी
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. याच क्रमांकावर खेळताना त्यानं तिसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावलं होतं. दरम्यान, एकदिवसीय मालिकेत त्याच्या जागेवर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर काम करतो.


हे देखील वाचा-