IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara)  दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याद्वारे कारकिर्दीतील 100वी कसोटी खेळणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना पुजाराने सांगितले की, मी भारतासाठी 100 कसोटी सामने खेळेन असे मला कधीच वाटले नव्हते. तसंच त्यानं यावेळी त्याच्या एका स्वप्नाबद्दलही विचारण्यात आलं.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न


आपल्या स्वप्नाबद्दल बोलताना पुजारा म्हणाला की, त्याला भारतासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकायची आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या अगदी जवळ आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत संघाला ऑस्ट्रेलियाला किमान 3-1 ने पराभूत करावे लागेल. भारतीय संघाने नागपुरातील पहिला सामना जिंकला आहे. याआधीही टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.


पुजारा त्याच्या 100 व्या कसोटीबद्दल म्हणाला, “100 वा कसोटी सामना खेळण हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे. यात माझ्या वडिलांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो सामना पाहण्यासाठी उद्या ते येथे येणार आहेत. मी सर्वांचा आभारी आहे, पण अजून बरेच काही साध्य करायचे आहे.'' यानंतर पुजाराला संघातून वगळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एका क्षणी पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह त्याला वगळण्यात आले होते. याबद्दल पुजारा म्हणाला की, “हे आव्हानात्मक होते. मी काऊंटी खेळत होतो आणि मला कुठे काम करायचे आहे याविषयी राहुल भाई आणि विकी पाजी यांच्याशी सतत संपर्कात होतो."


यशासाठी संयम महत्त्वाचा : पुजारा


पुढे बोलताना पुजारा म्हणाला, “संयम आपोआप येत नाही, त्यासाठी तुम्हाला मानसिक ताकद हवी. तयारी महत्त्वाची आहे. मी ज्युनियर क्रिकेट आणि वयोगट क्रिकेटमध्ये धावा केल्या. यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत आणि मला वाटते की जेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित कराल, तेव्हा शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल.”


पुजाराची कारकिर्द थोडक्यात


ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये टीम इंडियासाठी पदार्पण करणार्‍या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत करिअरमध्‍ये एकूण 99 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 169 डावात फलंदाजी करताना त्याने 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 धावा आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-