IND vs PAK Weather : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावर पावसाचे संकट असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून सुरु होत्या. पण चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे, कारण, कोलंबोमध्ये सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज कोलंबोमध्ये 100 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. पण सध्या तरी पावसाने उसंत घेतली आहे. सकाळपासून कोलंबोमध्ये कडाक्याचे ऊन पडले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना वेळेवर होणार आहे. 


कोलंबोमधील वातावरण सध्या एकदम साफ आहे. आकाशात ढगही नाहीत. त्यामुळे आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निर्धारित वेळेत होण्याची शक्यता आहे. सध्या कोलंबोमधील मैदानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये हवामान एकदम स्वच्छ आहे. 










संध्याकाळी पावसाची शक्यता - 


हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोलंबोमध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कोलंबोत कडक ऊन पडले आहे. त्यामुळे सामना वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. पण संध्याकाळी सातनंतर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


कुठे अन् कधी होणार सामना ?
आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.  तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.  


पहिल्या सामन्यात काय झाले होते.. ? 


शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय.