India vs Australia 3rd Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून (बुधवार) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने नागपूर कसोटी (Nagpur Test) एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. तसेच, दिल्ली कसोटीही (Delhi Test) टीम इंडियाने सहा विकेट्सनी आपल्या नावे केली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ तिसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्याच्या तयारीत आहे. पण क्रिडा विश्लेषकांच्या मते ही कसोटी जिंकणं टीम इंडियासाठी फारसं सोपं नसेल. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. दरम्यान, इंदूर कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया WTC फायनलमध्येही आपले स्थान निश्चित करेल.


लाल मातीच्या खेळपट्टीमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये 


इंदूर कसोटी जिंकणं टीम इंडियासाठी फारसं सोप नसेल आणि यावेळी ऑस्ट्रेलियन संघाकडून त्यांना कडवं आव्हान मिळू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (एमपीसीए) इंदूर कसोटीसाठी होळकर स्टेडियममध्ये लाल मातीची खेळपट्टी तयार केली आहे, ज्यावर फास्ट बॉलर्सना फायदा होऊ शकतो. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघालाही मालिकेत पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. इंदूरमधील लाल मातीची खेळपट्टी पाहता, तिसऱ्या कसोटीचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन या दोघांचाही प्लेईंग-11 मध्ये समावेश करु शकतो. 


होळकर स्टेडियमची खेळपट्टी तयार करण्यासाठी एमपीसीएने खास मुंबईहून लाल माती आणली आहे. मुंबईच्या मैदानाची खेळपट्टी केवळ लाल मातीची आहे, जिथे ऑस्ट्रेलियाला सामने खेळण्याचा अनुभव आहे. अशा खेळपट्ट्यांवर चेंडू खूप उसळतो आणि बॅटवर वेगाने येतो. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना शेवटच्या दोन कसोटी सामन्यांपेक्षा यंदाच्या सामन्यात चांगला फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळण्यात माहिर आहेत आणि त्यामुळे त्यांना इंदूरमध्ये क्रीझवर चांगलं स्थिरावण्यास मदत होऊ शकते. त्यामुळेच इंदूर कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे नक्की. 


तीन वेगवान गोलंदाजांसह इंदूर कसोटीत उतरणार टीम इंडिया 


इंदूरमधील धावपट्टी फलंदाजीसाठी उत्तम असल्याचं उदाहरण म्हणजे, इंदूरमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 353 आहे. इंदूरची लाल मातीची खेळपट्टी पाहता भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह या सामन्यात उतरु शकतो. विशेष म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियानं प्रत्येकी तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते, मात्र आता त्यात बदल होऊ शकतो. इंदूरची खेळपट्टी लाल मातीची बनलेली असेल, पण जसजसा सामना पुढे जाईल तसतशी वेगवान गोलंदाजांनी तयार केलेल्या रफमुळे ती फिरकीपटूंसाठीही फायदेशीर ठरु शकते. असं झालंच तर मात्र कांगारुंना या मैदानावर 12.50 ची सरासरी असलेल्या रविचंद्रन अश्विनपासून जरा जपूनच राहावं लागेल. 


पहिल्या दोन कसोटी सामन्यांत स्पिनर्सची धमाकेदार खेळी 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्पिनर्सचं वर्चस्व होतं. स्लो बॉलर्सनी एकूण 52 बळी घेतले आहेत. पण इंदूर कसोटीत फास्ट बॉलर्ससाठी उत्तम संधी आहे. गेल्यावेळी इंदूरमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालनं दुहेरी शतक झळकावलं होतं. तर मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी मिळून 14 विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने तो कसोटी सामना अवघ्या 3 दिवसांत जिंकला होता.


तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ 


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


जर बॅटर्सनी क्रीज सोडणं बंद केलं नाही, तर बॉलर्सचीही चूक नाही; नॉन-स्ट्रायकर रन आउटवर MCC चा थेट इशारा