IND vs NZ : एक लो-स्कोरिंग सामनाही किती रोमहर्षक आणि अटीतटीचा असू शकतो, हे लखनौच्या मैदानात आज दिसून आलं. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारतानं एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यावर फलंदाजीत मात्र अखेपर्यंत सूर्यकुमार यादवनं टिकून राहून नाबाद 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन हार्दिकनं नाबाद 15 धावांची साथ त्याला दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 






संपूर्ण सामन्याचा विचार करता सर्वात आधी न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करुन भारतावर दबाव आणण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक चांगली होती, ज्याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी पुरेपुर घेतला आणि न्यूझीलंडचा मोठ्या लक्ष्याचा डाव हाणून पाडत केवळ 99 धावांतच न्यूझीलंडला रोखलं. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर याने सर्वाधिक 19 धावा केल्या. 20 षटकांत 8 गडी गमावत न्यूझीलंडनं 99 रन केले. भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्या, चहल, कुलदीप, सुंदर आणि दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


सूर्यकुमार टिकला आणि भारत जिंकला


120 चेंडूत 100 धावांचं माफक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला आज एक सोपा विजय मिळेल असं वाटत होतं. पण किवी संघाच्या गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी करत भारतावर सुरुवातीपासून दबाव आणला. चौथ्या षटकांत शुभमन गिल 11 रन करुन बाद झाल्यावर भारताचा डाव फारच स्लो झाला. ईशान किशन लयीत दिसत होता, पण राहुल त्रिपाठी आणि त्याच्यात योग्य ताळमेळ न झाल्याने तो धावचीत झाला. 13 रन करुन राहुलही बाद झाला. सूर्यकुमार आणि सुंदर डाव सावरत होते, तोच पुन्हा चूकीच्या ताळमेळामुळे सुंदर 10 धावांवर धावचीत झाला. पण मग कॅप्टन हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अनुक्रमे नाबाद 15 आणि नाबाद 26 धावा करत 19.5 षटकांत भारताला सामना जिंकवून दिला. विजयानंतर कर्णधार आणि उपकर्णधार दोघांनी गळाभेट घेतली.   






हे देखील वाचा-