India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. सर्वात आधी भारताच्या शुभमन गिलने (Shubhman Gill) वादळी द्वीशतक ठोकत भारताची धावसंख्या 349 पर्यंत नेली. त्यानंतर 350 धावांचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलनं 140 धावांची तुफान खेळी करत जवळपास गाठलंच होतं. पण अखेरच्या षटकात तो शार्दूल ठाकूरच्या अप्रतिम चेंडूवर पायचीत झाला आणि भारतानं सामना 12 धावांनी जिंकला. 


सामन्याचा विचार केला तर आजही भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु करत भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली भागिदारी उभारली. पण 34 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर त्यानंतर विराटही स्वस्तात तंबूत परतला. ईशानही दुहेरी संख्या गाठू शकला नाही. पण या  एका बाजूने शुभमन मात्र टिकून खेळत होता. त्यानं शतक पूर्ण केलं, तेव्हा सूर्याने 31 तर पांड्याने 28 धावांची साथ शुभमनला दिली. पण दोघेही बाद झाल्यावरही शुभमनने तुफान फलंदाजी करत द्वीशतक  पूर्ण केलं. त्यानं 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार ठोकत 208 धावा केल्या ज्यामुळे भारताची धावसंख्या 349 पर्यंत पोहोचली.


ब्रेसवेल-सँटनर जोडीची कमाल भागिदारी


न्यूझीलंडचा संघ (New Zealand Team) 350 धावाचं तगडं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला आणि सुरुवातीपासून त्यांचे फलंदाज बाद होऊ लागले. कॉन्वे (Devon Conway) 10 धावांवर बाद झाल्यावर इतरही फलंदाज स्वस्तात बाद होत होते. फिन अॅलननं 40 धावांची चांगली खेळी केली. पण तो देखील शार्दूल ठाकूरचा शिकार झाला. एकीकडे पटापट विकेट पडत असताना सातव्या विकेटसाठी मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी एक अप्रतिम भागिदारी केली. पण सँटनर 57 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने षटकार चौकार ठोकत ब्रेसवेल लक्ष्याचा पाठलाग करतच होता. पण हार्दिक पांड्याने 49 वी ओव्हर अप्रतिम टाकत एक विकेट घेत केवळ 4 रन दिल्या. ज्यानंतर अखेरच्या षटकात 20 धावा न्यूझीलंडला हव्या होत्या. शार्दूल गोलंदाजीला आला पहिला बॉल सिक्स तर दुसरा वाईड टाकला. त्यानंतर मात्र शार्दूलनं अप्रतिम यॉर्कर टाकत ब्रेसवेललं पायचीत केलं आणि सामना भारताने 12 धावांनी जिंकला.


हे देखील वाचा-