IND vs BAN : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम अशी गोलंदाजी करत अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं आहे. स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तर 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. भारताकडून केवळ केएल राहुल (KL Rahul) याने 73 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे भारताने 186 धावांपर्यंत मजल मारली असून बांगलादेशसमोर 187 धावांचे फारच माफक आव्हान आहे.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सामना असणाऱ्या मैदानाची खेळपट्टी पाहता आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार होती. तसच आजवर चेस करणाऱ्या संघांनी या ठिकाणी 113 पैकी 59 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेशने प्रथम गोलंदाजी घेतली. कर्णधाराच्या निर्णयाप्रमाणे बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली. सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावांवर एका अप्रतिम कॅचचा शिकार झाला.


त्यानंतर श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. पण त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. अखेर 186 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. तर बांगलादेशकडून स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसन याने महत्त्वपूर्ण असे 5 विकेट्स घेत कमाल गोलंदाजी केली. ए. हुसेन यानेही तब्बल 4 विकेट्स घेतले, तर मेहिदी मिराजने एक गडी बाद केला.


हे देखील वाचा-