IND vs AUS Final Toss Update :  अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये फायनलचा (WC Final) थरारक सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचं अनेकांना आश्चर्य वाटले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंचाही समावेश आहे. रोहित शर्माचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल यांच्याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. फायनल सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघामध्ये मागील सामन्यातीलच खेळाडू आहे. 


टीम इंडियाचे शिलेदार : Team India playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन : Australia playing XI
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.


दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर
विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत. भारताने सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. क्रिकेट विश्वात दोन्ही संघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.


हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs AUS Head to Head)
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं पारड जड आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळाले आहेत. कांगारूने एकूण 83 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 57 विजय मिळवले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. बरं, दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर भारतीय संघानेच वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत. आजचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानावर हे दोन्ही संघ यापूर्वी तीनदा भिडले आहेत. येथेही टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत.


खेळपट्टी कशी असेल? (Narendra Modi Stadium Pitch Report)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या विश्वचषकाचे चार सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले आहेत. यामध्ये तीन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला सहज विजय मिळाला. यासोबतच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेही विजयाची नोंद केली आहे. अशा स्थितीत येथे धावांचा पाठलाग सोपा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरू शकते. मात्र, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक फार महत्त्वाची मानत नाहीत.