मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारताने विजय नोंदवला आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.


सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमन गिलने नाबाद 35 आणि अजिंक्य रहाणेने नाबाद 27 धावा केल्या. अॅडलेड कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्याने टीम इंडियासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा होता.


दरम्यान या कसोटी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच भारताचं वर्चस्व राहिलं. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं जसप्रीत बुमराने चार, आर अश्विनने तीन, मोहम्मद सिराजने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 195 धावांमध्ये गुंडाळलं.


यानंतर भारतीय फलंदाजांनी आपल्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रहाणे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 326 धावा करत ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी मिळवली.


ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज माघारी परतले होते. मग पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन यांच्या 57 धावांच्या भागीदारी रचली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला काहीशी झुंज दिल्यानंतर पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियाला 200 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे 69 धावांची आघाडी असल्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य मिळालं. ते भारताने आठ विकेट्स राखून पार केलं.


संबंधित बातम्या


IND Vs AUS 2nd Test | भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं 70 धावांचं आव्हान


IND Vs AUS 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला, ऑस्ट्रेलिया 6/133


INDvsAUS : कर्णधार अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडिया सुस्थितीत