IIT Baba and Virat Kohli : विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने 241 धावा केल्या आणि भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानचे हे आव्हान टीम इंडियाने विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि शुभमन गिल आणि श्रेयसच्या साथीने सहजपणे गाठलंय.
IIT वाल्या बाबाची भविष्यवाणी सपशेल खोटी, टीम इंडियाचं निर्विवाद वर्चस्व
दरम्यान, टीम इंडियाच्या विजयानंतर आयआयटीवाल्या बाबाची सर्वांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दोन दिवसांपूर्वी आयआयटीवाल्या बाबाने भारत पाकिस्तानविरोधात पराभूत होईल, अशी भविष्यवाणी केली होती. विराट कोहलीला म्हणाव कितीही जोर लाव टीम इंडिया पराभूत होणार म्हणजे होणार, असं त्या बाबाने म्हटलं होतं. मात्र, त्याची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे. टीम इंडियाने निर्विवाद विजय मिळवत त्याची भविष्यवाणी म्हणजे फुसका बार असल्याचं सिद्ध केलंय.
विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
भारताकडून विराट कोहलीने 100, शुभमन गिलने 46, आणि श्रेयस अय्यरने 56 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांही चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादवने तीन विकेट्स पटकावत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठवण्यापासून रोखले, तर हार्दिक पंड्यानेही दोन विकेट्स पटकावल्या.
पाकिस्तानकडून साऊद शकिलने 62 धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकने 241 धावा केल्या. साऊद शिवाय, रिझवानने 46 तर खुशदीलने 38 धावांचे योगदान दिले. दरम्यान, पाकने दिलेल्या धावसंख्येचा टीम इंडियाने सहजपणे पाठलाग केलाय. विराटने शतकी खेळी करत भारताचा विजय मिळवून दिला. सोबतच विराटने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 14000 धावा देखील पूर्ण केल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या