ICC World Cup IND W vs SA W : महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेपुढे 274 धावांचे आव्हान ठेवले आहे. सात विकेटच्या बदल्यात भारतीय महिला संघाने 50 षटकात 274 धावा केल्या आहेत. यामध्ये स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतके केली आहेत. या तिघींच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 274 धावा केल्या आहेत.


दरम्यान, क्राइस्टचर्च इथं आजचा हा सामना खेळवला जात आहे. हा सामना भारतीय महिला संघाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. शेफाली वर्माने विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर ती 53 धावा करुन बाद झाली. त्यानंतर खेळायला आलेली यस्तिका भाटिया दोन धावा करुन बाद झाली. त्यानंतर आलेल्या कर्णधार मिथाली राजने स्मृती मानधनाला चांगली साथ दिली. या दोघींनीही अर्धशतके झळकावली. स्मृती मानधनाने 71 धावा केल्या, तर मिथाली राजने 68 धावांची खेळी केली. तसेच हरमीनप्रीत कौरने 48 धावांची खेळी केली.


या विश्वचषकातील आजचा सामना भारतीय महिला संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आज भारतीय महिलांसमोर तगड्या दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. भारताचे आत्तापर्यंत सहा सामने झाले असून, यापैकी तीन सामने भारतीय महिला संघाने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत. त्यामुळं आजचा विजय भारतीय महिला संघासाठी महत्वाचा आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड दोन्ही संघानी तीन तीन सामने जिंकले आहेत. पण नेटरनरेट भारताचा काहीसा कमी असल्याने भारत पाचव्या तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. उद्या इंग्लंडचाही सामना असून ते पराभूत झाल्यास आणि भारताने विजय मिळवल्यास भारत सहज सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर दोन्ही संघ जिंकल्यास भारताने इंग्लंडपेक्षा मोठ्या फरकाने सामना जिंकायला हवा. जेणेकरुन भारत सेमीफायलमध्ये पोहोचेल. भारत सध्या गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे.