Shubman Gill Catch Controversy: टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Austrelia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) चा अंतिम सामना खेळत आहे. आज सामन्याचा पाचवा दिवस आहे आणि विजयासाठी टीम इंडियाला  (Team India) 280 धावांची गरज आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (10 जून) ऑसी संघानं 8 विकेट्सच्या मोबदल्यात 270 धावा करून दुसरा डाव घोषित केला आणि टीम इंडियासमोर 444 धावांचं मोठं लक्ष्य उभं केलं. 


कांगारूंचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं दमदार सुरुवात केली. पण 41 धावांवर आपला पहिला विकेट गमावला. शुभमन गिल अवघ्या 18 धावांवर कॅमेरून ग्रीनकडून स्लिपमध्ये कॅचआऊट झाला. पण गिलची ही विकेट खूपच वादग्रस्त ठरली. सध्या सोशल मीडियावर गिलच्या विकेटवरुन खूप वाद-विवाद सुरू आहेत. अशातच गिलला सॉफ्ट सिग्नल नियमाचा फायदाही मिळाला नाही. अशातच आयसीसीनं यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये आयसीसीकडून गिलच्या विकेटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, गिलला सॉफ्ट सिग्नल नियमाचा फायदा का नाही झाला, याबाबतही सांगितलं आहे. 






...अन् गिलच्या कॅच आऊटबाबत झाला वाद 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC चा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केल्यानंतर मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाचे फलंदाज मैदानात उतरले. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली, पण 41 धावांवर संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलची विकेट पडली. ऑस्ट्रेलियाच्या ग्रीननं स्लिपमध्ये कॅच घेतला आणि हाच विकेट वादग्रस्त ठरला. पहिल्याच नजरेत ग्रीननं कॅच घेताना बॉल जमिनीला टच झाल्याचं दिसलं. अखेर आऊट की, नॉट आऊट, हा निर्णय थर्ड अम्पायरकडे गेला. रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अम्पायरनं गिलला आऊट घोषित केलं. पण ज्यावेळी सामन्यादरम्यान रिप्ले दाखवण्यात आला, तो पाहिल्यानंतर अनेक फॅन्सचं गिल आऊट नसतानाही त्याला आऊट दिल्याचं मत झालं. 






ग्रीननं घेतलेल्या कॅचचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तुम्ही पाहुन समजू शकता की, ग्रीननं खरंच कॅच पकडताना बॉल जमिनीला टच झालेला की, नाही? थर्ड अंपायरनं आऊट दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा नाराज असल्याचं पाहायला मिळालं. तसेच, शुभमन गिलही अवाक् झाल्याचं दिसून आलं. सामन्यात थर्ड अंपायर इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रॉ आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित दर्शकांनी 'चीटर-चीटर'च्या घोषणा दिल्या. 






गिलला 'सॉफ्ट सिग्नल'चा फायदा का मिळाला नाही? 


गिलची ही विकेट खूपच वादग्रस्त ठरली. याच विकेटबाबत आयसीसीनं निवेदनही जारी केलं आहे. आयसीसीनं म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणात गिलला सॉफ्ट सिग्नल नियमाचा फायदा का मिळाला नाही? आता त्याबाबत सांगणं गरजेचं झालं आहे. जूनच्या सुरुवातीपासून सॉफ्ट सिग्नलचा नियम क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आला आहे. म्हणजेच जून 2023 नंतर हा नियम कोणत्याही सामन्यात लागू होणार नाही. त्यामुळेच हा नियम या कसोटी सामन्यातही लागू नव्हता, म्हणूनच शुभमन गिलला 'सॉफ्ट सिग्नल' नियमाचा फायदा मिळाला नाही.


सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार, जेव्हा एखादा झेल संशयास्पद असायचा, तेव्हा अम्पायर त्यांचा निर्णय (आउट किंवा नॉट आउट) द्यायचे, त्यानंतर तो निर्णय थर्ट अम्पायरकडे पाठवला जायचा. अशावेळी संशयित परिस्थितीवर निर्णय घेताना तिसऱ्या अम्पायरचाही गोंधळ उडाला, तर मात्र मैदानावर उपस्थित असलेल्या अम्पायर्सनी दिलेला निर्णय कायम ठेवला जायचा. 




सॉफ्ट सिग्नल नियमावरुन यापूर्वी झालेत अनेक वादविवाद 


WTC अंतिम सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल' नियम वापरला जाणार नाही. म्हणजेच, मैदानावरील अम्पायर्सना निर्णयाचा संदर्भ देण्यापूर्वी 'सॉफ्ट सिग्नल' देण्याचा अधिकार राहणार नाही. यापूर्वी, मैदानावरील अम्पायर्सनी संशयास्पद निर्णयांबाबत तिसऱ्या अम्पायरची मदत घेतल्यास त्याला 'सॉफ्ट सिग्नल' द्यावा लागत होता. हा नियम 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. पण इथून पुढे हा नियमच क्रिकेटविश्वातून हद्दपार करण्यात आला आहे. 


'सॉफ्ट सिग्नल' नियमावरुन अनेकदा गदारोळ झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, मार्नस लॅबुशेनला मैदानावरील अम्पायर्सनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट केलं होतं. स्लिपमध्ये पकडलेला हा कॅच क्लीन नव्हता, पण मैदानावरील अम्पायर्सचा निर्णय रद्द करण्यासाठी थर्ड अम्पायरकडे पुरेसे पुरावे नव्हते, त्यामुळे मैदानावरील अम्पायर्सचाच निर्णय कायम ठेवण्यात आला. 


कांगारूंचं टीम इंडियाला 444 धावांचं आव्हान 


ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या अंतिम सामन्याचा आज (11 जून) पाचवा दिवस आहे. आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 444 धावांचं लक्ष्य दिलं आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियानं चौथ्या दिवशी 3 विकेट गमावत 164 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी टीम इंडिया ऑस्ट्रेलियानं दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार आज सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. दरम्यान, आज दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. आज कसोटीचा विश्वविजेता घोषित होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


WTC Final, India vs Australia: कोहली-रहाणेमुळे अपेक्षा उंचावल्या, विजयासाठी 280 धावांची गरज; टीम इंडिया 121 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार?