Ind vs Ireland: बीसीसीआयनं (BCCI) बुधवारी आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या दौऱ्यात भारतीय संघ आयर्लंडशी दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. याचदरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं (Wasim Jaffer) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं आहे. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्यानं चमकदार कामगिरी करून दाखवली. एवढेच नव्हे तर पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. ज्यामुळं हार्दिकचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं विषय ठरत आहे. आयपीएल 2022 सुरु होण्यापूर्वी हार्दिकच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, आयपीएलची ट्रॉफी जिंकून हार्दिक पांड्यानं अशा प्रश्नांना पूर्णविराम लावला.


वसीम जाफर काय म्हणाला?
"माझ्या मते पांड्या भारताच्या कर्णधारपदाला पात्र आहे. ज्या सामन्यात रोहित उपलब्ध नाही, अशा सामन्यात हार्दिक पांड्याला पहिली पसंती मिळू शकते. टी-20 सामन्यांसाठी भारतीय निवडकर्ते हार्दिक पांड्याचा विचार करू शकतात. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्यानं ज्या प्रकारने गुजरातच्या संघाचं नेतृत्व केलं आहे, हे बघता त्याला संधी दिली पाहिजे. ज्या सामन्यांत रोहित शर्मा नाही, अशा सामन्यात त्याला संधी दिली पाहिजे. रोहितनंतर भारतीय टी-20 संघासाठी हार्दिक पांड्या माझी पहिली निवड असेल."


आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी
गुजरात टायटन्सच्या संघाचं नेतृत्व करताना हार्दिक पांड्यानं 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही हार्दिक पांड्यानं चांगली कामगिरी करून दाखवली. या हंगामात त्यानं आठ विकेट्स घेतले आहेत. 


भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.


हे देखील वाचा-