भारतीय पुरुष क्रिकेट संघाने श्रीलंका आणि इंडिया (SL vs IND) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-0 ने गमवली आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर भारताला ही पहिलीच मालिका गमवावी लागली आहे. तीन सामन्यांच्या तिसऱ्या सामन्यात तर भारताचा तब्बल 110 धावांच्या फरकाने दारुण पराभव झाला आहे. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य ठेवले होते.


भारताने 2-0 ने मालिका गमवली


श्रीलंकेने समोर ठेवलेल्या 249 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 138 धावाच करू शकली. गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर  या पहिल्या मालिकेत भारत विजयी कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. गंभीरने या मालिकेदरम्यान संघात तीन महत्त्वाचे बदल केले. याच बदलांमुळे भविष्यात भारतीय संघ कशी कामगिरी करणार असे विचारले जात आहे.  


फलंदाजांचा क्रम बदलला 


श्रीलंकेविरोधात खेळवल्या गेलेल्या प्रत्येक एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीरने फलंदाजांचा क्रम बदलला. त्यामुळे काही फलंदाजांना सेट होण्यास वेळ लागला. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली वगळता इतर एकही फलंदाज त्यांच्या निर्धारित क्रमावर फलंदाजी करू शकले नाहीत. परिणामी टीम इंडियाच्या मधळ्या फळीतील फलंदाज फारसी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. तिन्ही सामन्यांत भारतीय संघांचे संपूर्ण गडी बाद झाले.  


प्रमुख गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही


श्रीलंकेविरोधात खेळवल्या गेलेल्या तिन्ही एखदिवसीय सामन्यांत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हनमधील प्रमुख गोलंदाज त्यांची पूर्ण षटकं टाकू शकले नाहीत. परिणामी मैदान पुरक नसताना श्रीलंकेने प्रत्येक सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा केल्या. विशेष म्हणजे तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग यासारख्या आघाडीच्या गोलंदाजाला बाहेर ठेवण्यात आलं. 
 अर्शदीप सिंगच्या जागेवर तरुण खेळाडू रियान परागला संधी देण्यात आली. याचा परिणाम म्हणून टीम इंडियाला गोलंदाजी विभागात खास कामगिरी करता आली नाही. गौतम गंभीर जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देत आहेत. 


प्लेइंग इलेव्हनवर विश्वास नाही  


गौतम गंभीर यांनी श्रीलंकेविरोधातील प्रत्येक सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. दोन एकदिवसीय सामन्यांत के एल राहुल चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यासाठी बाहेर ठेवण्यात आलं. गौतम गंभीर यांनी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवरही विश्वास ठेवला नाही. त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या बाहेर ठेवण्यात आलं. 


हेही वाचा :


Kangana Ranaut On Vinesh Phogat : आधी बोचरा वार अन् आता कौतुकाची उधळण, विनेशसाठी कंगनाची खास पोस्ट


कुस्तीपटू विनेश फोगाटला भारतरत्न आणि राज्यसभेची खासदारकी मिळणार? 'या' पक्षाकडून मागणी, चर्चांना उधाण