ENG vs IND: हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. 


इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं पाच षटकात दोन विकेट्स गमावल्या. भारताचा सलामीवीर शिखर धवन एक तर, रोहित शर्मा 17 धावा करून माघारी परतला. विराट कोहलीला या सामन्यातही काही खास कामगिरी करता आली नाही, तो 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारनं पंतसोबत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही 16 धावांवर असताना बाद झाला. दरम्यान, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 115 चेंडूत 133 धावांची भागेदारी केली. मात्र, 36 व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला. यानंतर पंतनं जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 56 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. ऋषभ पंतचं एकदिवसीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. रवींद्र जडेजानं 15 चेंडूत 7 धावा केल्या. इंग्लंडकडून रीस टोप्लीनं तीन, कार्स आणि ऑर्टननं प्रत्येकी एक- एक विकेट्स घेतली.


प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावांची गरज होती. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा , क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी 27-27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युजवेंद्र चहलनं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन तर, रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली.


हे देखील वाचा-