निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
धोनीला 'ते' ग्लोव्ज घालून खेळता यावे यासाठी बीसीसीआयचा पुढाकार, प्रशासकीय अध्यक्ष म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2019 08:21 PM (IST)
विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे.

मुंबई : विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. त्यानंतर आता याप्रकरणावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी धोनीच्या बाजूने भूमिका मांडली आहे. महेंद्रसिंग धोनीला विश्वचषकातल्या उर्वरित सामन्यांमध्येही त्याचे बहुचर्चित ग्लोव्ज परिधान करता यावेत, यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला आहे. विनोद राय याबाबत म्हणाले की, आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. धोनीने ग्लोव्जवर लावलेला बॅज हा कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही, तसेच धोनी जाहिरातबाजी म्हणूनही त्याचा वापर करत नाही. त्यामुळे धोनीला तो बॅज लावून खेळण्यात अडचण यायला नको. राय म्हणाले की, धोनीला हे बॅज ग्लोव्जवर लावून खेळता यावे, यासाठी आम्ही आयसीसीकडे मागणी करणार आहोत. यासंदर्भात बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. धोनीच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केले आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली. धोनीच्या या कृतीची भारतीय चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. पण तो बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगून, आयसीसीने धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावर धोनी काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.