Hardik Pandya Fitness : आयसीसी (ICC) टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) चं आयोजन 17 ऑक्टोबरपासून  (Oman) आणि यूएई (UAE)मध्ये केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय (BCCI) ने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी यंदा टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे. टी20 विश्वचषकाला आता एक महिन्याहूनही कमी वेळ शिल्लक आहे. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या फिटनेस चिंतेची बाब ठरली होती. दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी म्हटलं होतं की, पांड्या पूर्णपणे फिट आहे आणि तो विश्वचषक खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 


आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत खेळला नाही हार्दिक 


हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसमुळं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला नाही. त्यानंतर गेल्या रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळताना दिसून आला पण त्यानं गोलंदाजी केली नाही. तेव्हापासूनच हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर हार्दिकच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यावरुनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


हार्दिक पांड्या टी20 विश्वचषक स्पर्धा खेळणार? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर हार्दिक पांड्याला त्याच्या फिटनेसमुळं टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. सर्व संघांकडे आपले संघ बदलण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतची वेळ आहे. अशातच हार्दिक पांड्या जर गोलंदाजी करु शकला नाही, तर निवड समिती शार्दुल ठाकूर किंवा श्रेयस अय्यरला संघात स्थान देऊ शकते. सध्या शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्या हार्दिकच्या फिटनेसकडे लक्ष ठेवलं जात आहे. येत्या काही काळात हार्दिकच्या टी20 वर्ल्डकप खेळण्याबाबतचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, काल आयपीएलच्या मैदानात रंगलेल्या मुंबई विरुद्ध पंजाबच्या सामन्यात हार्दिक पांड्या फॉर्मात दिसून आला. हार्दिक पंड्याने 30 बॉलमध्ये नाबाद 40 धावा केल्या. मुंबईला 2 षटकात 16 धावांची आवश्यकता होती. पंड्याने 19 षटकात आव्हान पूर्ण केले. मुंबईचा कालचा विजय हार्दिक पांड्याशिवाय शक्यच नव्हता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडिया 


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.