PM Modi And Anthony Albanese At Ahmedabad Test : बॉर्डर गावस्कर मालिका अंतिम टप्यात आहे. या मालिकेत भारत 2-1 च्या फरकाने आघाडीवर आहे. अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि (Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) येणार असल्याचे वृत्त आहे.  


अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज हजेरी लावणार?


मिळालेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीची तिकीटविक्री थांबवण्यात आली आहे. पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता उर्वरित चार दिवस चाहत्यांना तिकिटे मिळणार आहेत. दरम्यान, नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे झालेले कसोटी सामने तीन दिवसांच्या आत संपले होते. 




तिकिंटाची किंमत किती ?


 गुजरात क्रिकेट असोसिएशन यांनी अहमदाबाद टेस्टसाठी तिकिटांची विक्री सुरु केली आहे. पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता उर्वरित चार दिवस चाहत्यांना तिकिटे मिळणार आहेत.  200 ते 2000 रुपये यादरम्यान तिकिटे असतील...  


9 मार्चपासून कसोटीला सुरुवात -


टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनलमध्ये थेट स्थान मिळवण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून हा सामना खेळवला जाणार आहे.  टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही करुन चौथ्या कसोटीत कांगारूंना चीतपट करावं लागणार आहे. तसेच, थेट 3-1 ने कसोटी मालिका आपल्या खिशात घालावी लागेल. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्ये पोहोचली, तर फायनल्समध्ये टीम इंडियाचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. लंडनमध्ये 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळावली जाणार आहे. 


अहमदाबादमध्ये गेल्या दोन कसोटीत टीम इंडियाची धमाकेदार खेळी 


कोरोना महामारीच्या काळात अहमदाबादमध्ये सलग दोन कसोटी सामने खेळले गेले. टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तो तिसरा सामना (डे-नाईट) दोन दिवसांत 10 गडी राखून जिंकला आणि त्यानंतर पुढील कसोटी तीन दिवसांतच खिशात घातली. ही कसोटी टीम इंडियानं एक डाव आणि 25 धावांनी जिंकली. म्हणजेच, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेलेले गेले दोन कसोटी सामने टीम इंडियासाठी उत्तम होते.