Sunil Gavaskar on Bhuvneshwar Kumar : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) डेथ ओव्हर्समधील खराब कामगिरी ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब असल्याचं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केलं आहे. भुवनेश्वरने मागील काही सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये भरपूर धावा दिल्या आहेत, ज्यामुळे भारताला सामना गमवावा लागला आहे. मंगळवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यातही 209 धावांचं लक्ष्य देऊनही भारत पराभूत झाला. यावेळी देखील 19 वी ओव्हर भुवनेश्वरने टाकत तब्बल 16 धावा दिल्या. तो पुन्हा धावा वाचवण्यात अयशस्वी ठरला. या सामन्यानंतरच गावस्कर यांनी ही प्रतिक्रिया दिली.


सुनील गावस्कर 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना म्हणाले, 'दुसऱ्या डावात फार दव पडलं असं मला वाटत नाही. आपण खेळाडूंना क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करताना हात सुकवण्यासाठी टॉवेल वापरताना पाहिलं नाही. त्यामुळे दव नसतानाही इतकं मोठं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने गाठलं यामुळे भारतानं चांगली गोलंदाजी केली नाही, हे स्पष्ट आहे. यावेळी देखील 19 वी ओव्हर हा चिंतेचा विषय असल्याचं दिसून आलं.


डेथ ओव्हर्समध्ये भुवीची खराब गोलंदाजी


सुनील गावसकर पुढे बोलताना म्हणाले, 'भुवनेश्वर कुमारसारख्या दिग्गज गोलंदाजाला ओव्हर दिल्यानंतही तो मागील काही सामन्यांत बऱ्याच धावा देत असल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 19व्या षटकात गोलंदाजी करताना 18 चेंडूत 49 धावा दिल्या आहेत. प्रत्येक बॉलवर सरासरी तीन धावा गेल्या आहेत. त्याच्यासारख्या अनुभवी  गोलंदाजाने 18 चेंडूंमध्ये केवळ 35 ते 36 धावा देण्याची अपेक्षा आपण करु शकतो, त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये भारताची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे.


बुमराहचं पुनरागमन महत्त्वाचं


यावेळी बोलताना गावस्कर यांनी जसप्रीत बुमराह याने पुनागमन केल्यास चिंता कमी होईल असंही म्हटलं आहे. बुमराह हा मागील बऱ्याच सामन्यांत भारतीय संघात नसून आशिया कपमध्येही दुखापतीमुळे तो नव्हता. पण आता तो दुखापतीतून सावरल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात संघात येईल अशी आशा आहे.


हे देखील वाचा-