Babar Azam: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासह त्यानं एका खास विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग नऊ सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय. तसेच या सामन्यात त्यानं विराट कोहलीचा एक खास विक्रमही मोडला आहे. ज्यामुळं सोशल मीडियावर विराट आणि बाबर यांची एकमेकांशी तुलना केली जात आहे. 


सलग 9 डावात बाबरचं दमदार प्रदर्शन
यावर्षी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपासून बाबर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या सामन्यात बाबरनं 196 धावा केल्या. त्यानंतर त्यानं 66 धावा केल्या. बाबरने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 55 धावांची खेळी केली. बाबरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 57, 114 आणि 105 धावा केल्या. त्यानंतर टी-20 सामन्यात त्यानं 66 धावा केल्या. बाबरनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 103 चेंडूत 107 धावा केल्या.


विराटचा खास विक्रम मोडला
पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाची कमान हाती घेतल्यानंतर बाबरने 13 डावांत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीच संघाचा कर्णधार असताना एक हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला 17 डाव लागले. बाबर आझमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र, त्याच्याकडून ही संधी हुकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ खेळाडूंनी सलग तीन शतके झळकावली आहेत.  यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.


हे देखील वाचा-