Kapil Dev on Majha Katta : 1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. या विजयाच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. दरम्यान या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी या भव्य विजयानंतरही दोन गोष्टींची खंत कायम मनात राहिल्याचं आवर्जून सांगितलं...


1983 विश्वचषकाच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने एक वेगळी चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला मात देत आत्मविश्वास कमालीचा वाढलेल्या भारतीय संघाने नंतर सलग दोन सामने गमावूनही पुनरागमन करत विश्वचषक जिंकला. यावेळी कर्णधार कपिल यांनी उल्लेखणीय कामगिरी केली. पण त्यांना या विजयाबद्दल विचारलं असता आनंद तर खूप होता पण दोन गोष्टींची खंतही होती. तर यातील पहिली गोष्ट म्हणजे तत्कालीन संघात 14 खेळाडू होते. यामध्ये दुखापत आणि खराब फॉर्म यामुळे 14 पैकी 13 खेळाडूंना आलटून-पालटून खेळण्याची संधी मिळाली. पण एक खेळाडू सुनील वॉल्सन यांना मात्र एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय दुसरी खंत म्हणजे भारताचे स्टार फलंदाज सुनील गावस्कर यांना दुखापत आणि खराब फॉर्ममुळे संपूर्ण स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. इतके भारी खेळाडू असूनही त्याला एकही अर्धशतक झळकावता न आल्याने वाईट वाटतं. या दोन गोष्टीबाबत खंत वाटते असं कपिल यांनी स्वत: सांगितलं.