लंडन : वर्ल्डकपमधील सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघ कसून सराव करत आहे. काल (शनिवारी) सराव करत असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो नंतर सरावही करु शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या गोटात तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु विराटची ही दुखापत गंभीर नसून तो वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचे बीसीसीआयमधील सुत्रांनी सांगितले आहे. या बातमीनंतर क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अंगठ्यावरील उपचारांनंतर विराटने पुन्हा एकदा नेट्समध्ये येऊन सराव केल्याचे सांगण्यात आले आहे.


विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास सुरु होण्याआधीच एक वाईट बातमी आली. सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जखमी झाला. शनिवारी साऊथेम्प्टन येथे भारतीय संघ सराव करत होता. यावेळी विराटने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा सराव केला. परंतु सरावादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

5 जून रोजी भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. त्याआधीच सरावादरम्यान विराटच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. विराटच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली होती. परंतु विराट कोहली पहिल्या सामना खेळणार असल्याने क्रिकेट संघ आणि चाहत्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.

विराटला दुखापत झाल्यानंतर खूप वेळ तो मैदानात परतलाच नाही. तसेच बराच वेळ विराट टीम इंडियाचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फारहार्ट यांच्याकडून ट्रिटमेंट घेत होता. त्यांच्यासोबत या दुखापतीबाबत बोलत होता.

दुखापत झाली तेव्हा फारहार्ट यांनी विराटच्या अंगठ्यावर पेनकिलर स्प्रे मारला. त्यानंतर विराट खूप वेळ दुखापतग्रस्त अंगठ्याला बर्फाने शेक देत असल्याचे पाहायला मिळाले. मैदानातून बाहेर पडतानादेखील त्याच्या हातात एक बर्फाने भरलेला ग्लास होता.

गोलंदाज विजय शंकर आणि अष्टपैलू खेळाडू केदार जाधवही त्याच्या दुखापतींमधून सावरले आहेत.