IN vs SA, Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे. मालिकेती दुसरा एकदिवसीय सामना 15 मार्च रोजी लखनऊ येथे खेळवण्यात येणार होता. तर तिसरा एकदिवसीय सामना 18 मार्च रोजी कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांत खेळवण्यात येणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या मालिकेतील पहिला सामना 10 मार्च रोजी पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला होता.


BCCI ने भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पुढिल दोन्ही सामने कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने घोषणा करताच दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये ही मालिका पुन्हा खेळवण्यात येणार की, नाही याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही.


याआधी क्रिडा मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर BCCI ने गुरुवारी लखनऊ आणि कोलकत्ता येथे खेळवण्यात येणारे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजेच, हे दोन्ही सामने प्रेक्षकांशिवाय घेण्यात येणार होते. याचबरोबर आयोजकांनी सामन्यांचे विकण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत.


Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार


आयपीएलवर कोरोनाचं सावट


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरु होणारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 13चं आयोजन लांबणीवर पडलं आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी) ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.



आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनीही हा मोसम 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती. आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझनची सुरुवात 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून होईल. आयसीसीच्या घोषणेआधी अशी अटकळ बांधली जात होती की, शनिवारी (14 मार्च) होणाऱ्या आयपीएलच्या गर्व्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत या मोसमाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्णय होऊ शकतो.


परदेशी खेळाडूंना व्हिसा नाही


केंद्र सरकारने बुधवारी (11 मार्च) परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता. सरकारने 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आयपीएलमधील विविध संघांनी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती.

दरम्यान, 29 मार्च ते 24 मे दरम्यान आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन केलं जाईल, अशी घोषणा बीसीसीआयने सुरुवातीला केली होती. परंतु वेळापत्रकाबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नव्हती.


संबंधित बातम्या : 


#CoronaVirus | आयपीएलची तिकीट विक्री होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


Women T20 World Cup | फायनल पाहण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्ण स्टेडियममध्ये, MCG ची माहिती


IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय