मुंबई : टीम इंडियात समावेश होऊनही यो यो या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने अंबाती रायुडूला भारताकडून खेळता आलं नाही. यानंतर आता या टेस्टवर दिग्गजांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मात्र ही टेस्ट पास झाल्यानंतरच संघात जागा मिळेल, असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे.


या टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे मोहम्मद शमी, संजू सॅमसन आणि अंबाती रायुडू यांना संघातील स्थान गमवावं लागलं. रायुडू बाहेर झाल्यामुळे हे प्रकरण तापलं आहे. सीओए प्रमुख (कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासक समिती) विनोद राय याबाबत बीसीसीआयला विचारणा करण्याची शक्यता आहे.

रायुडूने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत 602 धावा केल्या होत्या, ज्याच्या आधारावर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. मात्र यो यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर त्याला संघातलं स्थान गमवावं लागलं आणि त्याच्या जागी सुरेश रैनाची निवड करण्यात आली. यानंतर आता या फिटनेस टेस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.