मुंबई: बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं विराट कोहलीचा हट्ट मान्य करणार का? याबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कारण की, रवी शास्त्री यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार अशी क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पण अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.


विराट कोहलीशी असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेनं भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाविनाच विंडीज दौऱ्यावर गेली होती.

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम केलेल्या रवी शास्त्री यांचे संघातील खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. याचाच फायदा त्यांना होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. पण बीसीसीआय कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रवी शास्त्रींची कारकीर्द :

रवी शास्त्री हे भारतीय संघातील एक उत्कृष्ट अष्ट्रपैलू खेळाडू होते. त्यांनी 80 कसोटी आणि 150 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी 6000 हून अधिक धावा आणि 280 गडी बाद केले आहेत. भारतानं 1983 मध्ये पहिला विश्वचषक पटकावला. त्यावेळी या संघात रवी शास्त्रींचाही समावेश होता.

संबंधित बातम्या:

विराटशी चर्चा करुन प्रशिक्षकाची घोषणा करु : सौरभ गांगुली

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक असतील : सुनील गावसकर


प्रशिक्षकाचं नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर करा, 'त्रिमूर्ती'ला आदेश