नवी दिल्ली : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने 2.2 कोटींची नुकसानभरपाई दिली आहे. आयपीएल 8 मध्ये न खेळल्यामुळे झालेल्या नुकसानासाठी बीसीसीआयने शमीला एकूण 2,23,12,500 रुपये भरपाई म्हणून दिले आहेत.


 

 

गुडघ्याची दुखापती असूनही मोहम्मद शमी 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघात सहभागी झाला होता. तसंच त्याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेतही तो खेळला होता. मात्र दुखापतीमुळे शमीला 2015 मध्येच झालेल्या आयपीएलच्या आठव्या मोसमाला मुकावं लागलं होतं.

 

 

बीसीसीआयच्या एका अहवालानुसार, आयपीएल 2015 मध्ये दुखापतीमुळे न खेळल्याने मोहम्मद शमीला एकूण 2 कोटी, 23 लाख 12 हजार, 500 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

 

 

विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोहम्मद शमीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पाच सामन्यात 17 विकेट्स घेतल्या होत्या. दुखापत असूनही त्याने विश्वचषकात खेळण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे त्याचं नुकसान झालं, कारण तो 2015 मधील आयपीएलमध्ये तो खेळू शकला नाही. त्यावेळी त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. आता बीसीसीआयने शमीला नुकसानभरपाई दिली आहे.