नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 2004 साली ग्रेग चॅपेल यांना प्रशिक्षकपदी नेमण्यासाठीचा आग्रह, ही करिअरमधील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे. सौरवच्या नव्या ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकातून त्याने आपली चूक मान्य केली आहे.


या संदर्भातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सौरव म्हणाला की, “2004 मध्ये मायदेशी परतत असताना प्रशिक्षक नेमणुकीवर चर्चा सुरु होती. या चर्चेचा विषय जॉन राईट यांच्यानंतर टीमसाठी योग्य प्रशिक्षक कोण? हा होता. त्यावेळी माझ्या मनात पहिल्यांदा ग्रेग चॅपेल यांचं नाव आलं. मला वाटलं की, ‘ग्रेग चॅपेल हेच टीम इंडियाला चॅलेंजर्स पोझिशनमधून नंबर एकच्या शर्यतीत घेऊन जाऊ शकतील.’ ज्यावेळी प्रशिक्षकाचा शोध सुरु होता. त्यावेळी मी दालमियांना पहिल्यांदा चॅपेल यांचं नाव सुचवलं. पण त्यावेळी मला काहीजणांनी अडवलं होतं. त्यातील एक सुनील गावस्कर देखील होते.”

सौरव पुढे म्हणाला की, “सुनील गावस्करांनी त्यावेळी मला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी सांगितलं होतं. त्यासोबत टीममध्ये काम करताना अनेक अडचणी येतील, याची जाणिवही करुन दिली होती. तसेच, त्यांचा मागील प्रशिक्षक म्हणून रेकॉर्ड चांगला नसल्याचंही सांगितलं होतं.

“दालमियांनी एक दिवस सकाळी बैठक बोलावली होती. आणि चर्चा करण्यासाठी मला आपल्या घरी बोलावलं होतं. विशेष म्हणजे, ग्रेग चॅपेल यांचे भाऊ इयान चॅपेल यांनाही वाटत होतं की, ग्रेग चॅपेल हे टीम इंडियासाठी प्रशिक्षक म्हणून अयोग्य आहेत. पण मी या सर्वांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. आणि मी माझ्या मनाचं ऐकलं. त्यानंतर जे काही घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. काही गोष्टी तुम्हाला साथ देतात. जसं की, माझा ऑस्ट्रेलिया दौरा. तर काही गोष्टी तुम्हाला साथ देत नाहीत. जसं की, ग्रेग अध्याय. अशी खंतही त्याने यावेळी व्यक्त केली.
ग्रेग चॅपेल यांना टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अध्याय असल्याचंही सौरव यावेळी सांगितलं. तो म्हणाला की, “यामुळे मला कर्णधारपद सोडावं लागलंच. शिवाय, मला एक खेळाडू म्हणूनही संघात जागा मिळाली नाही. मला हे सर्व लिहितानाही स्वत: वर राग येतो. जे काही झालं ते सर्व अनाकलनीय आणि अक्षम्य होतं.”