मुंबई : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. 'पाकिस्तानसाठी हे आणीबाणीचं वातावरण आहे. पंतप्रधानांनी संसदेत येऊन उत्तर द्यावं.' अशी मागणी करतानाच हीना यांनी लवकरात लवकर संसदेचं संयुक्त सत्र भरवण्याचा सल्लाही दिला आहे.


भारताने एलओसीचं उल्लंघन केल्याचं प्रकरण इस्लामिक सहकार संघटना (ओआयसी), संयुक्त राष्ट्र आणि मित्रराष्ट्रांमध्ये मांडण्याचा निर्णय झाल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवाही उपस्थित असल्याचं म्हटलं जातं.

असं सुरु झालं प्लॅनिंग

पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीलाच आजच्या एअर स्ट्राईकचं प्लॅनिंग सुरु झालं. देशाच्या संरक्षणमंत्र्यांसमोर लष्कराने विविध पर्याय ठेवले. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठीचा योग्य पर्याय संरक्षणमंत्र्यांना निवडायचा होता.

एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांनी एअर स्ट्राईकची संपूर्ण रणनीती आखली. मुजफ्फराबादमार्गे पाकिस्तानमध्ये घुसण्याचं निश्चित करण्यात आलं. पाकिस्तानच्या हद्दीत किमान 10 ते 15 किलोमीटर घुसण्याचं ठरलं.

प्रत्यक्ष कारवाईला 15 फेब्रुवारीला सुरुवात झाली. पाकिस्तानला चकवण्यासाठी कराचीजवळ भारताने पाणबुड्या तैनात केल्या
त्यामुळे भारत आता समुद्रमार्गे हल्ला करणार अशी पाकिस्तानची धारणा झाली. दुसरीकडे 16 तारखेला भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये ड्रोन पाठवले. या ड्रोनने अतिरेक्यांच्या हालचाली टिपल्या आणि भारताला पाठवल्या. याच पुराव्यांच्या आधारे टार्गेट निश्चित करण्यात आलं, बालाकोट

18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गुप्तचर यंत्रणा आणि रॉचे प्रमुख यांची बैठक झाली. दिल्लीतल्या या बैठकीमध्ये 5 टार्गेट निश्चित करण्यात आले. 19 फेब्रुवारीला या एअर स्ट्राईकची तारीख निश्चित करण्यात आली.

एअर स्ट्राईक

ग्वाल्हेर, भटिंडा आणि अंबाला एअर बेसवरुन 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता 'मिराज 2000'च्या 12 विमानांनी आकाशात भरारी घेतली. विमानांचा ताफा थेट पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाला. काश्मिरच्या आकाशातून उडत आपली विमानं थेट पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसली.

आपल्या विमानांनी मध्यरात्री 3 वाजता पाकिस्तानची सीमाही ओलांडली आणि पाकिस्तानच्या आकाशामध्ये घिरट्या घालण्यास सुरुवात केली. लक्ष्य होतं पुलवामावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला... बालाकोट.

VIDEO | दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी स्पाईस 2000 बॉम्ब



बालाकोट कुठे आहे?

बालाकोट हे पाकिस्तानातील मनशेरा जिल्ह्यातील एक गाव. चहुबाजूनं जंगलांनी वेढलेला प्रदेश. बालाकोटमध्ये 2005 साली आलेल्या भूकंपानंतर जनसामन्यांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं. ओसामा बिन लादेनच्या अबोटाबादपासून 50 किमींच्या अंतरावर असलेला दहशतवाद्यांचा गड.

बालाकोटच्या खैबर पख्तुनवामधल्या जैशच्या अतिरेकी तळांवर मध्यरात्री 3 वाजून 30 मिनिटांनी मिराज विमानांनी निशाणा साधला. एकाच वेळी 12 विमानं बालाकोटच्या डोंगरातल्या जैशच्या बंकरवर तुटून पडली. सुमारे 21 मिनिटे हा हल्ला सुरु होता.

दहशतावाद्यांच्या खात्म्यासाठी इस्राईल बनावटीच्या 'स्पाईस 2000' बॉम्बचा वापर करण्यात आला होता. SPICE= Smart Precise Impact Cost Effective. यातील प्रत्येक बॉम्ब एक हजार किलो वजनाचा आहे.

कमी उंचीवरुन घिरट्या घालत मिराज विमानांनी जैशच्या दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड्स नेस्तनाबूत केले. जैशच्या सुमारे 350 दहशतवाद्यांना काही कळायच्या आत आकाशातून भारतीय हवाई दलाचा कहर कोसळला आणि त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या.

सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर

जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचं सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर बालाकोटमध्ये होतं. अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या कारवायानंतर दहशतवाद्यांनी इथं मुक्काम हलवला. पुलवामा हल्ल्यानंतर सीमाभागातील दहशतवाद्यांना सुट्टीसाठी इथंच धाडलं होतं. आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं चालणारं हे सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर.

मोठ्या दहशतवाद्यांसाठी या ठिकाणी एसी रुम्स होत्या. बालाकोटमध्ये वर्षाला 10 हजार तरुणांचं ब्रेन वॉश करुन त्यांना जिहादी बनवलं जातं. पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी इथल्या तरुणांना ट्रेनिंग देण्यासाठी यायचे.

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ आणि मेहुणा युसुफ अजहर यांचा खात्मा झाला आहे.

अवघ्या 21 मिनिटांच्या संहारानंतर भारताचे 12 जांबाज वैमानिक आपल्या मिराज 2000 विमानांसह पुन्हा भारताच्या दिशेने वळले. भारतात सूर्योदय होण्याआधीच भारताच्या वायुपुत्रांनी पाकिस्तानला सर्वात मोठा हादरा दिला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, तेही बाराव्या दिवशी.