Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलं होते. आता या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. 


अपहरणाच्या वृत्तानंतर तालिबान्यांनी हे वृत्त फेटाळले.  आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होते. तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी हे वृत्त निराधार असून तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असे ते म्हणाले.


अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्र  Etilaatroz च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय सुरक्षित असून पासपोर्ट पडताळणीनंतर सोडून देण्यात आले आहे. वृत्तपत्राच्या माहितीनुसार, तालिबानने  150 पेक्षा अधिक लोकांना  आलोकोजई येथे नेले होते ज्यामध्ये सर्वाधिक भारतीय नागरिकांचा समावेश होता. तसेच यामध्ये काही अफगाणी नागरिक आणि अफगाणी सिख देखील होते. आलोकोजई कंपनी हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. तालिबानने सोडून दिल्यानंतर सर्व काबुल एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत.


दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु आहे. सूत्रांचं म्हणणे आहे की, 15 ऑगस्टपूर्वीच ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु झाली होती. 15 ऑगस्ट रोजी काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेविषयीची चिंता वाढली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :