Sri Lanka Crisis : श्रीलंका (Sri Lanka) इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते अगदी इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka Ex President Gotabaya Rajapaksha) आता लवकरच श्रीलंकेमध्ये परतणार आहेत. सध्या राजपक्षे थायलँडमध्ये (Thailand) वास्तव्यास आहेत. गोटाबायो राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) शनिवारी श्रीलंकेत परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गोटाबाया यांच्या परतीची तयारी


राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने रानिल विक्रमसिंघे यांची नवे राष्ट्रपती म्हणून म्हणून नियुक्ती केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रमसिंघे यांनी राजपक्षे यांच्या परतण्याची व्यवस्था केली आहे. राजपक्षे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना यांनी गोटाबायाच्या परतीची व्यवस्था करण्याची विनंती केली होती.


12 जुलैला सोडला देश


श्रीलंकेमध्ये भीषण आर्थिक संकट निर्माण झाल्याने जनतेनं जागोजागी निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर देशातील नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. तसेच त्रस्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरही मोर्चा नेला होता. जनतेकडून गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या दरम्यान 12 जुलै 2022 रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडत पलायन केले होते.


थायलंड आधी सिंगापूर आणि मालदीवमध्ये मुक्काम


श्रीलंकेतून पलायन करत राजपक्षे यांनी आधी मालदीव आणि सिंगापूरमध्ये (Singapore) आश्रय घेतला होता. गोटाबाया राजपक्षे श्रीलंका सोडून मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते  सिंगापूरला पोहोचले. मात्र राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूरही सोडावं लागलं. राजपक्षे यांचा सिंगापूर येथे राहण्यासाठीचा व्हिसा संपल्यामुळे त्यांनी सिंगापूर सोडून थायलँडमध्ये (Thailand) आश्रय घेतला. 


श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती बिकट, उपासमारीची वेळ


श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा (Food Crisis) निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध सारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.