Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. इस्रायलचे हवाई दल हमास येथे सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे इथली परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन 'अजय' सुरू केले आहे. इस्रायलमधून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणणे हा त्याचा उद्देश आहे. इस्रायलमधून आतापर्यंत 212 भारतीय भारतात परतल्याचे वृत्त आहे.


 






 


इस्रायलमधून 212 भारतीय भारतात परतले
भारत सरकारतर्फे ऑपरेशन अजय चालवण्यात येत आहे, ज्याद्वारे भारतीय इस्रायलमधून परतत आहेत. इस्रायलहून एअर इंडियाचे 1140 विमान 212 भारतीयांना घेऊन आज 5:54 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले आहे. 


 


हमासच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांची संख्या


हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये प्राण गमावलेल्या लोकांची संख्या सुमारे 1300 आहे, तर 3418 लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 1,537 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6,612 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये 1500 हून अधिक हमासचे सैनिकही मारले गेले आहेत. जर आपण वेस्ट बॅंकबद्दल बोललो, तर तेथे आतापर्यंत 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 600 लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे, जिथे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.


 


हमासमध्ये IDF कडून बॉम्बफेक
इस्रायली संरक्षण दल (IDF) च्या लढाऊ विमानांनी गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यात नौदल कमांडोचे घर, रजिसटेंस कमिटी आणि हमास ऑपरेशन हाऊसचा समावेश होता, जिथे हमास नेता याह्या शिनवारचा भाऊ लपला होता. यावेळी हमासचे निरीक्षण तळही उडवून देण्यात आले आहेत.


 



इस्रायलने गाझावर 6000 बॉम्ब टाकले
इस्रायलने म्हटले आहे की गाझामधील हमासला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी 6000 बॉम्ब टाकले आहेत, हे सर्व बॉम्ब मागील सहा दिवसांत टाकण्यात आले. इस्रायलच्या हवाई दलाने सांगितले की, हमासमधील 3600 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.



भारताकडून अधिकृत निवेदनही जारी 


भारताकडून गुरुवारी इस्रायल-हमासबाबत अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले. पॅलेस्टाईनबाबत निवेदनात म्हटले आहे की, 'यासंदर्भात आमचे धोरण दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण आहे. सुरक्षित आणि मान्यताप्राप्त सीमांमध्ये सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य पॅलेस्टाईनच्या स्थापनेसाठी, तसेच इस्रायलशी शांततापूर्ण संबंधांसाठी इस्रायलशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा भारताने नेहमीच पुढाकार घेतला आहे.