ओमानच्या खाडीवरील हे बंदर भारत आणि इराण या दोन्ही देशांसाठी राजकीय तसेच सामरिक दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वचे बंदर आहे. इराणने या प्रकल्पावर 34 कोटी डॉलर खर्च केले असून, स्थानिक कंपनी खतम-अल-अंबिया या कंपनीने हे काम पूर्ण केलं आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी इतर अनेक कंत्राटी कंपन्या आणि भारताच्या एका सरकारी कंपनीनेही मदत केली आहे. या विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्याने, चाहाबहार बंदराची क्षमता आता 25 लाख टनावरुन 85 लाख टन झाली आहे.
चाहाबहार बंदराचं भारताच्या सामरिक दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचं बंदर आहे. कारण, एकतर हे बंदर उभारणीच्या प्रकल्पात भारत हा मुख्य सहयोगी देश आहे. शिवाय, या बंदरामुळे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापारासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहाण्याची गरज नाही. या बंदरामुळे भारत, इराण, अफगाणिस्तानमध्ये एक नवा राजकीय मार्ग तयार झाला आहे.
यापूर्वी भारताला अफगाणिस्तानसाठी वस्तूंची निर्यात करताना, पाकिस्तानची मदत घ्यावी लागत होती. पण आता भारतातून निघालेलं जहाज थेट इराणच्या चहाबहार बंदरावर उतरवता येणार आहे. यानंतर हा माल ट्रकमध्ये भरुन अफगाणिस्तानात नेणे सहज शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे, चाहाबहार बंदर हे पाकिस्तान आणि चीनच्या ग्वादर पोर्टपासून केवळ शंभर किलोमीटर दूर आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यास, चाहाबहार बंदराद्वारे भारताला पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देणे शक्य होणार आहे.