नवी दिल्ली : मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या, पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपलं रिपोर्ट कार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तान, चीन, अमेरिकेसह इतर देशांशी विविध मुद्द्यांवरुन भारतानं घेतलेल्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं. पॅरिस करारावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पणीचा सुषमा स्वराज यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आर्थिक मदतीसाठी भारतानं पॅरिस कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली नसल्याचं, स्वराज यांनी यावेळी स्पष्ट केलं.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने हवामन बदलासंबंधातील पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे अमेरिकेच्या हितांना बाधा पोहचत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. पण यामुळे भारत आणि चीनला याचा सर्वाधिक फायदा होईल, असंही ट्रम्प यांनी सांगितलं होतं. यावरुन सुषमा स्वराज यांनी ट्रम्प प्रशासनाला सुनावलं आहे.

सुषमा स्वराज म्हणाल्या की, ''पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता. हा करार म्हणजे आमच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. आजही आमच्याकडे ग्रामीण भागात नद्यांचं पूजन केलं जातं. केवळ या कराराच्या माध्यमातून मदत निधी मिळावा, या अपेक्षेनं भारतानं या करारावस स्वाक्षरी केली नाही.''

विशेष म्हणजे, भारताच्या हितांवर परिणाम होईल, असे कोणतेही निर्णय ट्रम्प प्रशासनाकडून घेण्यात येऊ नयेत, यासाठी आपण सदैव अमेरिकन काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरुनही स्वराज यांनी यावेळी भारताची भूमिका मांडली. ''भारत-पाक संबंधांसाठी आमचा तीन मुद्द्यावर भर आहे. एक म्हणजे, आम्हाला चर्चेद्वारे प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा - पण चर्चेसाठी कोणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. तिसरा म्हणजे, चर्चा आणि दहशतवाद हे दोन्हीही एकत्रित चालू शकत नाहीत.''

गेल्या तीन वर्षातील चीनसोबतच्या भारताच्या संबंधावरही सुषमा स्वराज यांनी दृष्टीक्षेप टाकला. स्वराज म्हणाल्या की, ''चीनच्या One Belt One Road योजनेला, भारताच्या एकतेला धक्का लागू नये, यासाठी आम्ही विरोध दर्शवला आहे. शिवाय रविवारी चामोली जिल्ह्यात चिनी हेलिकॉप्टरच्या घोसखोरीच्या मुद्द्यावरही आम्ही चीनसोबत चर्चा करणार आहोत,'' असं यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, स्वराज यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र धोरणांसंदर्भात घेतलेल्या विविध स्तरावरील आघाडीचं कौतुक केलं. आपल्या पंतप्रधानांनी एकाच वेळी इतर अनेक देशांशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्या म्हणाल्या की, ''साऊदी अरब आणि इराण हे दोन्ही देश एकमेकांना शत्रू मानत असले, तरी आपण या दोन्ही देशांशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरलो आहोत. याशिवाय पॅलेस्टाईन आणि इस्राईल सारखे दोन देश एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले असतात. पण त्यांच्याशीही आपले मैत्रिपूर्ण संबंध आहेत.''

गेल्या तीन वर्षातील आपली कामगिरी चांगली असल्याचं सांगून, या तीन वर्षाच्या कार्यकाळात परदेशात विविध घटनांमध्ये अडकलेल्या 80 हजार भारतीयांची सुखरुप सुटका केली. तसेच गरिबांच्या कल्याणासाठी जे धाडसी निर्णय घेतल्यानं, पंतप्रधानांची परदेशात लोकप्रियता वाढली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या

पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय