नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडावर आपटल्यानंतर पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. कारण कुलभूषण जाधव यांचं इराणमधून अपहरण करण्यात आलं, अशी माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने दिली आहे.


भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण यांना बलुचिस्तानातून 3 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तान सातत्याने करत आहे. मात्र आता आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने केलेल्या गौप्यस्फोटाने पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला.

पाकला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दणका

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. “महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये”, असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठणकावून सांगितलं.

इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला.

व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.

आंतराराष्ट्रीय न्यायालयातील 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने, पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या अटकेबाबत अद्याप विवाद असल्याचं मान्य केलं.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

कोर्टाची पाकिस्तानला चपराक

कोर्टाने पाकिस्तानला ठणकावत न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.

“कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांना मान्य आहे. मात्र ते हेर असल्याचे ठोस पुरावे नाहीत. पाकिस्तानच्या पुराव्यांवरुन कुलभूषण जाधव हे हेर किंवा स्पाय असल्याचं सिद्ध होत नाही. तसंच हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही, हे पाकचं म्हणणं चुकीचं असून, थेट फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही”, असं कोर्ट म्हणालं.

राजदूतांना का भेटू दिलं नाही?

या सुनावणीदरम्यान कोर्टाने भारताच्या मागणीचा उल्लेख करुन, भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांना का भेटू दिलं नाही, असा सवाल पाकिस्तानला केला. कोणत्याही परिस्थितीत परदेशी नागरिकाला राजनैतिक मदत मिळायलाच हवी, असं कोर्ट म्हणालं.

1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती. कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे. कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं, असं कोर्टाने नमूद केलं.

संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला


पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!


आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती


भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम


कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स


कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा