न्यूयॉर्क : भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेचा हात होता, असा खळबळजनक दावा एका वेबसाईटने केला आहे.


1966 मध्ये डॉ. होमी भाभा यांच्या विमानाचा अपघात झाला नव्हता, तर ते बॉम्बने उडवलं होतं, अशी माहिती एका सीआयए अधिकाऱ्याने दिल्याचा दावा TBRNews.org या वेबसाईटने केला आहे.

TBRNews.org च्या दाव्यानुसार, सीआयए म्हणजे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने डॉ. होमी भाभा यांचं विमान पाडलं होतं. टीबीआरन्यूज.ओआरजीने सीआयए अधिकारी रॉबर्ट टी क्रावली यांची काही विधानं छापली आहेत.

"आमच्या समोर अडचण होती, तुम्हाला माहित आहे, भारताने साठच्या दशकात प्रगती करत अणुबॉम्बवर काम करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये रशिया भारताची मदत करत होता. माझ्यावर विश्वास ठेवा, ते धोकादायक होते. त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. ही अडचण आणखी वाढवण्यासाठी ते व्हिएन्नाकडे जाणार होते, तेव्हाच त्यांच्या बोईंग 707 च्या कार्गोमध्ये स्फोट झाला," असं रॉबर्ट टी क्रावली यांनी सांगितलं.

म्हणजेच सीआयएला डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू कसा झाला, याची संपूर्ण माहिती होती. मात्र अजूनही होमी भाभा यांचा मृत्यू रहस्यमयरित्या झाल्याचं सांगितलं जातं.

भाभा यांच्या विमानाचा अपघात
24 जानेवारी 1966 रोजी डॉक्टर होमी जहांगीर भाभा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये एका परिषदेत सहभागी होण्यासाठी जात होते. मुंबई विमानतळावरुन एअर इंडियाच्या विमानात भाभा बसले होते. विमानाचं मुंबईतून उड्डाण झालं. डॉ. भाभा यांच्यासह विमानात 117 प्रवासी होते. या विमानाचा फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामधील ‘मोब्ला’ इथे अपघात झाला. होमी भाभा यांच्यासह विमानातील सर्व 117 प्रवाशांचा मृत्यू झाला.

1966 मध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष आढळले
खरंतर सुमारे 50 वर्षांपूर्वी विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे अवशेष शोधत असलेल्या डॅनियल रोशे यांना मागील गुरुवारी काही मानवी अवशेष मिळाले होते. रोशे यांच्या माहितीनुसार हे मानवी अवशेष त्याच विमान दुर्घटनेतील आहेत, ज्यात डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू झाला होता.

रोशे म्हणाले, "मला याआधी कधीही एवढे महत्त्वाचे मानवी अवशेष मिळाले नाहीत. यावेळी एक हात आणि पायाचा वरील भाग मिळाला आहे. जे अवशेष मिळाले आहेत, ते 1966 मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील महिला प्रवाशाचा असू शकतो."

अमेरिका होमी भाभांना घाबरली?


आता वेबसाईटचा दावा खरा मानल्यास अमेरिका भारतीय वैज्ञानिक होमी भाभा यांना एवढी घाबरली होती का, त्यांना धोकादायक समजत होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याचं उत्तर भाभांच्या एका वक्तव्यावरुन मिळू शकेल.

डॉ भाभा यांनी ऑल इंडिया रेडिओवरुन ऑक्टोबर 1965 मध्ये घोषणा केली होती, "जर त्यांना मुभा दिली तर भारत केवळ दीड वर्षात अणुबॉम्ब बनवून दाखवू शकतो."

मात्र डॉ. होमी भाभा अणुबॉम्बचा वापर कायम शांतता मोहीमांसाठी करण्याच्या बाजूने होते. भाभा यांनी हा विचार जगाला 1965 मध्ये स्विर्त्झलंडच्या जिनिव्हामधील अणु ऊर्जेवर झालेल्या एका परिषदेत बोलून दाखवला होता.

भारतने 18 मे 1974 रोजी पोखरणमध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर 1998 मध्ये पोखरणमध्येच दुसऱ्यांदा अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. सध्या भारताकडे 150-200 अणुबॉम्ब असल्याचा अंदाज आहे.

डॉ. होमी भाभा यांचा अल्पपरिचय


डॉक्टर होमी भाभा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. वयाच्या 15 व्या वर्षीच ते मुंबईतील शाळेतून सीनियर केम्ब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले.

होमी भाभा यांनी जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक असलेले आणि क्वाँटम थिअरीसाठी नोबेल पुरस्कारविजेते नील्सन बोर यांच्यासोबतही काम केलं होतं.

भाभा यांनी 1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि 1948 मध्ये अॅटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना केली. भाभा यांना प्रतिष्ठित अॅडम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यही बनले. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काने सन्मानित केलं.

डॉक्टर होमी जहांगीर भाभा नसते तर अण्वस्त्रसज्ज संपन्न देशांच्या यादीत भारत समावेश झाला नसता. होमी भाभा यांची दूरदृष्टीमुळे भारताकडे आण्विक तंत्रज्ञानात भारताचा बोलबाला आहे.