ढाका : बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. मोमेन यांनी भारताला विनंती केली आहे की, बांगलादेशी नागरिक अवैध पद्धतीने भारतात घुसले असतील तर भारताने आम्हाला त्यांची यादी द्यावी. बांगलादेश त्यांना परत मायदेशी येण्याची परवानगी देईल.


राष्ट्रीय नागरिक रजिस्टरबाबत (एनआरसी) मोमेन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना मोमेन म्हणाले की, भारत आणि बांगलादेशचे संबंध खूप चांगले आहेत. त्यामुळे एनआरसीचा त्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही.

मोमेन म्हणाले की, एनआरसी हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. तसेच भारताने बांगलादेशला आश्वस्त केले आहे की, एनआरसीचा बांगलादेशवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने आम्हाला सांगितले की काही बांगलादेशी नागरिक त्यांच्या आर्थिक कारणांमुळे दलालांच्या मदतीने भारतात दाखल होतात. त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द होईल.

मोमेन म्हणाले की, आमच्या नागरिकांऐवजी इतर कोणी आमच्या देशात घुसखोरी केली तर आम्ही त्याला परत पाठवू. भारताने दावा केला आहे की, मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली आहे. त्यास आम्ही उत्तर दिले की, जर भारतात असे बांगलादेशी घुसले असतील तर त्यांना परत पाठवा, आम्ही त्यांना परत मायदेशात घेऊ. कारण त्यांच्याकडे त्यांच्या देशात राहण्याचा अधिकार आहे.