World Migration Report: कोरोनामुळे आयुष्य जगण्याच्या मार्गात अनेक अमूलाग्र बदल केले आहेत. स्थलांतरणात देखील मोठे बदल झाले आहे. वर्ल्ड मायग्रेशनरिपोर्टनुसार, कोरोना काळात 28 कोटी स्थलांतर झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतर झालंय. कोरोना नसता तर जगभरात 20 लाखांहून अधिक स्थलांतर वाढलं असतं असं देखील जागतिक स्थलांतराच्या अहवालात नमुद केलंय. 


लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर निघालेले मजुरांचे जथ्थे स्थलांतरीतांचं भीषण वास्तव दाखवत होते. अनेकांना फाळणीत झालेल्या स्थलांतराची देखील आठवण झाली. अनेक मजूर दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधून आपल्या मूळगावी परतत होते. गावाकडून शहरांकडेआलेल्या मजुरांनी पुन्हा घरचा रस्ता धरला होता. ह्यामुळे भारतातील स्थलांतर आणि त्यांचे प्रश्न समोर आल्याने जागतिक स्थरावर असलेली ह्याची व्याप्ती देखील भारताला कळली आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक स्थलांतर अहवाल प्रकाशित झाला आहे. यात स्थलांतरितांची संख्या 2020 मध्ये वाढून 28.1 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे, हीच संख्या 2019 च्या आकडेवारीनुसार 27.2 कोटी होती. 


2020 सालामधील संपूर्ण जगातील स्थलांतराच्या आकडेवारीसंदर्भात नजर टाकली तर असं दिसून येतं की कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर ही आकडेवारी 20 लाखांनी अधिक असती. कोरोनामुळे लोकांना स्थलांतर करण्यास निर्बंध आले आणि त्यामुळेच स्थलांतर कमी झालं. ही आकडेवारी फक्त महामारीच्या पहिल्या वर्षातली आहे. त्यामुळे हा आकडा अधिक असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.


स्थालांतर हे माणसाच्या इतिहासाचा मोठा घटक आहे. प्रामुख्याने मागील शतकातील स्थलांतर हे युध्दजन्य परिस्थितीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे आणि आर्थिक प्रगतीसाठी होत होती असं निदर्शनास येतं. मात्र, मागील काही वर्षात यात हवामान बदलाची देखील भरपडली आहे. यासंदर्भात देखील हा अभ्यास भाष्य करतो. सोबतच हवामान बदलामुळे नागरिक कुठे स्थलांतर करीत आहेत, त्याचा प्रभाव आणि इतर पैलूंसंदर्भात देखील यात माहिती दिली गेली आहे. स्थलांतर हे आर्थिक, भौगोलिक, लोकसंख्येवर आधारित असं आकार घेत असतं. त्यामुळे ‘स्थलांतरणाचे कॉरिडॉर’ विकसित झाले आहेत. ज्यामध्ये ‘अ’ देशातून ‘ब’ देशामध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिक आहे. 


प्रामुख्याने भारताबद्दल बोलायचं झालं तर 2020 सालात भारतामधून सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर झाले. संयुक्त अरब अमिरात या देशात ३० लाखांच्या जवळपास भारतात जन्मलेल्या नागरिकांनी स्थलांतर केले आहे. जे जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे स्थलांतरणाचं ‘कॉरिडॉर’ म्हणून समोर येत आहे. अमेरीकेत भारतीयांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असून साऊदी अरबमध्ये देखील 25 लाखांच्या जवळपास भारतीय आहेत. दुसरीकडे, भारतीयांची स्थलांतराची संख्या मोठी असताना भारतात देखील बांगलादेशमधून मोठं स्थलांतर झाल्याचं जागतिक स्थलांतर अहवालातून स्पष्ट होतं. स्थलांतर केलेल्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मेक्सिको आणि रशियाचा ह्या देशांचा क्रमांक लागतो. मेक्सिको आणि अमेरीकेत आधीपासूनच स्थलांतराचा कॉरिडॉर विकसित आहे. जो जागतिक सर्वाधिक मोठा असा कॉरिडॉर आहे. मेक्सिकोतून 2020 च्या आकडेवारीनुसार अमेरीकेत 1 कोटी 10 लाख स्थलांतर झालंय. 


स्थलांतराची संख्या मोठी आहे तर तिकडे निर्वासितांची देखील संख्या मोठी दिसते. 2021 उजाडत असताना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जगभरात सध्या २६ कोटींहून अधिक निर्वासित आहेत. सर्वाधिक संख्या ही युद्धजन्य परिस्थिती अडकलेल्या सीरियातून झाली आहे. तब्बल ८० लाख निर्वासित ह्या देशातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, दक्षिण सुदान आणि म्यानमार ह्यादेशांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तानात देखील युद्धजन्य परिस्थिती जबाबदार आहे तर म्यानमारमध्ये रोहिंग्याचा विषय अजूनहीज्वलंत दिसतो. 


नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाढले असं जागतिक स्थलांतर अहवालाचं विश्लेषण केल्यास निदर्शनास येतं. दुसरीकडे, जागतिकस्तरावरील देशांतर्गत विस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर नैसर्गिक आपत्ती, मानवी संघर्षआणि हिंसाचारामुळे 2019 सालाच्या तुलनेत 2020 सालात ही संख्या मोठी आहे. 2019 मध्ये ही संख्या 31 कोटींच्या घरात होती तर 2020 मध्ये वाढून ही संख्या 40 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या: