What Happened on August 16th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 16 ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. तर आरआर पाटील यांची आज जयंती आहे.  आजच्याच दिवशी कोलकात्यामध्ये नरसंहार झाला होता. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.



अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन - 


भारताचे दहावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले होते. लोकनेते असा नावलौकिक असलेले अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. 


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.



आरआर पाटील यांची जयंती -


राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे 'आबा' म्हणजेच आरआर पाटील (रावसाहेब रामराव पाटील) यांची आज जयंती आहे. आरआर पाटील यांचा जन्म 16 ऑगस्ट 1957 रोजी तासगाव येथे झाला होता.  16 फेब्रुवारी 2015 मध्ये आबांनी अखेरचा श्वास घेतला होता. महाराष्ट्रात लेडिज बारचा नंगानाच बंद करण्याचा धाडसी निर्णय आरआर पाटील यांनी घेतला होता. 


BA, LLBA असे शिक्षण घेतलेले आरआर पाटील यांचा राजकीय संघर्ष मोठा होता. जिल्हा परिषदचे सदस्य असा सुरु झालेला प्रवास गृहमंत्री होण्यापर्यंत पोहोचला होता. अतिशय सामान्य घरातून आलेले आबा पहिल्यांदा 2004 ला उपमुख्यमंत्री झाले. तासगाव मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले होते. 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2009 मध्ये ते पुन्हा गृहमंत्री झाले. तंटामुक्ती गाव अभियान आणि ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवले होते.  


कविवर्य नारायण सुर्वे यांचं निधन -


भाकरीचा चंद्र दाखवणारे महाराष्ट्रीयन कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. 16 ऑगस्ट 2010 रोजी कवी नारायण सुर्वे यांनी ठाण्यात अखेरचा श्वास घेतला. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेत दारिद्र्य, अत्याचार आणि सामाजिक अन्याय या विषयांवर वारंवार लक्ष दिले. माझे विद्यापीठ, कामगार आहे मी..., तेव्हा एक कर!, विश्वास ठेव यासारख्या त्यांच्या कविता खूप गाजल्या होत्या. सुर्वे यांनी “बकी कही,” “घड्याळ,” आणि “जरीला” यासह अनेक कविता खंडांची निर्मिती केली. 


कोलकात्यामध्ये नरसंहार 


कोलकाता येथे 16 ऑगस्ट रोजी क्रूर असा नरसंहार झाला होता. वाशिंक दंगल उसळल्यामुळे 72 तासांत तब्बल चार हजार लोकांची हत्या करण्यात आली होती.  16 ऑगस्ट 1946 रोजी ही दुर्देवी घटना घडली होती. 



सैफ अली खानचा वाढदिवस - 


बॉलिवूडचा छोटा नवाब अशी ओळख असणाऱ्या सैफ अली खान याचा आज वाढदिवस आहे. 16 ऑगस्ट 1970 रोजी नवी दिल्लीमध्ये सैफ अली खान याचा जन्म झाला होता. सैफनं त्याच्या करिअरची सुरुवात परंपरा या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यानं 'दिल्लगी','मैं खिलाडी तू अनाडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सैफचं नाव घेतलं जातं. सैफ अली खान वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.  सैफ अली खान  आणि अमृता सिंह यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. त्यानंतर सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर हे 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सैफने अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली लग्न केले. 20 डिसेंबर  2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी  तैमुर असे ठेवले त्यानंतर करिना आणि सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर असं ठेवलं आहे. यामुळे सैफवर टीकेची झोड उडाली होती. 



1886 - स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन.


1913 - स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.


1913 - नोबल पारितोषिक विजेता इस्त्रायल राजकारणी, लिकुडचे संस्थापक आणि इस्रायलचे सहावे पंतप्रधान मेनाकेम बेगिन (Menachem Begin) यांचा जन्मदिन.


1954-   भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्मदिन.


1970 -  अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्मदिन.


1997 - पाकिस्तानी गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक नुसरत फतेह अली खान यांचे निधन.


2010 - जपानला मागे टाकून चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.