वाशिम : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (BJP MLA Rajendra Patni ) यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा (Karanja Vidhan Sabha) मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत (Mumbai) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. 


आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त आल्याने,  राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते  2003 पर्यंत विधानपरिषदेवर निवडून गेले होते.  


राजेंद्र पाटणी यांची कारकीर्द 


राजेंद्र  सुखानंद पाटणी  (भाजप आमदार)


 जन्म 19 जून 1964


1997 ते  2003 पर्यंत ते  विधान परिषदे चे  शिवसेने कडून आमदार  निवडून  गेले होते .


2004 ते 2009   पर्यंत ते   वाशीमच्या कारंजा मतदारसंघात  विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र  2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा  पराभव झाला.   त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका  ठेवत २०११ मध्ये  त्यांची  शिवसेना  पक्षातून   हकालपट्टी करण्यात आली होती . मात्र  2014च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून  त्यांना  उमेदवारी मिळाली. ते निवडून आले.


त्यानंतर भाजपकडून  त्यांना जिल्हाअध्यक्षपद  दिले  गेले, 2019 मध्ये  ते पुन्हा  कारंजा  मतदारसंघात भाजप आमदार म्हणून  निवडून गेले.   कोरोना काळात  त्यांना  दोन वेळा  कोरोना  झाला होता. त्याच दरम्यान किडनी विकाराने त्रस्त होते . त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर  झाल्याचं निदान झालं. 


गेल्या काही महिन्यापासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथ ते उपचार घेत होते.  आज  त्याचं सकाळी   9 च्या सुमारास निधन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे  अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या  निधनाने कुटुंबीयासह भाजपला मोठा धक्का बसला आहे. 


जीवनप्रवास 



  • कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचे निधन.

  • वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

  • गेल्या अनेक महिन्यांपासून होते आजारी

  • राजेंद्र पाटणी हे भाजपचे  आमदार.

  • देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख,

  • पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषद आणि विधानसभेत प्रतिनिधीत्व.

  • १९९७ ते २००३ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व.

  • २००४ शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी,

  • २००९ राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांच्याकडून पराभव

  • २०१४ भाजपात प्रवेश.

  • २०१४, व २०१९  भाजप कडून कारंजा विधासभेतून विजयी.

  • भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य.

  •  अभ्यासू,अत्यंत शांत  संयमी व्यक्तिमत्व  आणि जिल्ह्याच्या विकासात महत्वाचे योगदान असलेले नेते म्हणून परिचित.


कारंजा विधानसभा मतदारसंघ


कारंजा विधानसभा मतदारसंघ हा वाशीम जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाची निर्मिती 1978 मध्ये झाली. यापूर्वी हा मतदार संघ अकोला जिल्ह्यामध्ये होता.कारंजा शहर हे ऐतिहासीक आणि पौराणिक महत्व असलेल शहर आहे.दत्तगुरुचे जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरामुळे या शहराची देशभरात ओळख आहे.


औद्योगिक वसाहत शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ,तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. येथील कापसाची बाजारपेठ देशविदेशात ओळखली जायची.


या मतदारसंघामध्ये आतापर्यंत मतदार संघाबाहेरील उमेदवार निवडून येत आहेत.1978 मध्ये पहिला आमदार बनण्याचा मान अरविंद देशमुख यांना मिळाला. त्यानंतर या मतदारसंघामध्ये कोणत्याही उमेदवाराला आपला गड फार खाळ राखता आला नाही.2009 मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश डहाके हे पहिले स्थानिक आमदार म्हणून निवडून आले. 


शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांचा त्यांनी पराभव केला.या पराभवासाठी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी जवाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.पक्षविरोधी आरोप केल्यामुळे राजेंद्र पाटणी यांची पक्षातून हकालपट्टी केली.हकालपट्टीनंतरही राजेंद्र पाटणी राजकारणामध्ये शांत बसले नाहीत. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकली.या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके आणि भाजपाचे राजेंद्र पाटणी यांच्यात लढत झाली आणि मोदी लाटेमध्ये राजेंद्र पाटणी हे 4047 मतांनी निवडून आले. आता हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे.


या मतदारसंघात मराठा 40 टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी 10 टक्के मतदान आहे. तसेच या मतदारसंघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची काशी आहे,आणि समाजाचं मतदान या मतदारसंघामध्ये जास्त असल्यामुळे समाजातील अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत