मुंबई : मी गांधीजींचा पणतू आहे म्हणूनच नाही तर त्या विचारांना मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे गांधीजींची भक्ती करण्याचा अधिकार मला आहे. त्याचप्रमाणे आज गोडसेची भक्ती करणारे देखील अनेक लोक आहेत. त्यांना देखील गोडसेची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार त्यांच्यापासून कुणीही हिरावू शकत नाही, असे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलत होते. तुषार गांधी पुढे म्हणाले की, गोडसेप्रेमींवर जर गोडसेची भक्ती करायला निर्बंध घातला तर उद्या माझ्यावर गांधींची भक्ती करण्याचा निर्बंध येऊ शकतो. ती भक्ती चुकीची आहे की नाही यावर चर्चा होऊ शकेल. गोडसेची भक्ती करायची म्हटलं की तुम्हाला गोळ्या घालाव्या लागणार आहे. मागे गांधीजींच्या फोटोवर गोळ्या घातल्या. मी तर म्हणतो की फोटोवर मशीनगणने गोळ्या घाला. मात्र माणसं मारू नका. त्यांना गोळी मारण्याशिवाय काही येतच नाही. जसा मी अहिंसेच्या विचारधारेत मोठा झालो तसे ते हिंसेच्या विचारात मोठे झाले आहेत, असे तुषार गांधी यांनी म्हटलं.


पहिल्यांदा ओळख बापूंशी त्यानंतर महात्मा गांधींशी

तुषार गांधी म्हणाले की, माझी बापूंशी पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्याशी ओळख झाली. बापूंप्रती माझी पणजोबा म्हणून जवळीक आहे. माझं वर्गात मित्रांबरोबर कौतुक व्हायचं. माझी ओळख ही गांधींचे पणतू अशीच आहे. माझं नावही अनेकदा सांगत नव्हते. पूर्वी मला वाईट वाटायचं. मात्र ही ओळख वैश्विक आहे हे मला कळलं. त्यापेक्षा मोठी ओळख होऊच शकत नाही, असे ते म्हणाले.

मुख्याध्यापकांनी काढले शाळेबाहेर

यावेळी तुषार गांधी यांनी एक शाळेतला किस्सा सांगितला. ते म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेत बोलण्याच्या ओघात देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1948 साली मिळालं अशी तारीख सांगितली. त्यामुळे मुख्याध्यापकांनी मला शाळेतून काढून टाकले. वडील प्राचार्यांना भेटायला आले. त्यावेळी ते अक्षरशः लढले. मी इतिहासाबद्दल चूक करू शकत नव्हतो, असं ते म्हणाले. जॉर्डनला फिरायला गेल्यावर एका ज्यूसवाल्याने आम्हाला अमिताभ बच्चनचं नाव घेऊन ज्यूस फ्री दिला. तर दुसरीकडे गांधीजींचं नाव घेऊन आम्हाला एका मिठाईच्या दुकानात मिठाई दिली.

बापूंच्या वाटेवर जायचं असं ठरवावं लागलं नाही

तुषार गांधी म्हणाले की, मी बापूंच्या वाटेवर जायचं असं ठरवावं लागलं नाही. ते आपोआपच झालं. पणतू म्हणून डीएनएमध्ये काही येत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. घरात गांधीजींविषयी चर्चा व्हायची. मी लहानपणी आजी आजोबांकडून गांधीजींविषयी जाणून घ्यायचो. मी काही प्रश्न केल्यावर ते मला काहीतरी वाचायला द्यायचे. ते म्हणायचे की, तू वाच आम्ही सांगितलं तर त्यात आमचं मत येईल. त्यामुळं मला प्रश्नांची उत्तर स्वतः शोधण्याची सवय लागली, असं त्यांनी सांगितलं.

'लेट्स किल गांधी' असं नाव ठेवण्यामागे बनिया वृत्ती

तुषार गांधी म्हणाले की, पुस्तकाचं लेट्स किल गांधी असं नाव ठेवण्यामागे बनिया वृत्ती आहे. पुस्तक लोकांना आकर्षित करण्यासाठी असं नाव दिलं. त्यातून मला पैसे कमवायचे होते. मी सुरुवातीला मर्डर ऑफ द महात्मा असं नाव ठेवलं होतं. मी रिसेप्शनला दोन कव्हर करून ठेवली. त्यातून लेट्स किल गांधी 10 पैकी 8 लोक उचलायचे.

 माझ्या आडून बापूंना ट्रोल केलं जातं
आज सोशल मीडियावर मोठा वर्ग आहे जो गांधी म्हणजे वाईट असं म्हणतो. मला सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जात, माझ्या आडून बापूंना ट्रोल केलं जातं. बापूंच्या विचारांचं महत्व टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. तो विचार आता जगात घर करून बसला आहे. विदेशात देखील त्यांच्या विचारावर काम होत आहे. ते म्हणाले की, तो व्यक्ती मोहनदास म्हणून इतका मोठा कसा झाला यावर विचार केला जावा. ते आपल्या विचाराने मोठे झाले. त्यामुळे त्यांचा एकीकडे द्वेष केला जात असला तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गांधी विचाराला सोबत घेऊन काम होत आहे.