नवी दिल्ली : देशभरात मान्सून चांगला राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादनात 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी गहू, तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात एकूण 27 कोटी 33 लाख 80 हजार इतकी विक्रमी उत्पादन राहण्याची शक्यता कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.


कृषी मंत्रालयाने आपल्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकात अन्न-धान्याचं उत्पादन किती राहिल याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, जुलै 2016 ते जून 2017 महिन्यापर्यंत तांदळाचं 10 कोटी 91 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच गव्हाचं 9 कोटी 74 लाख टन आणि डाळींचं उत्पादन 2 कोटी 24 लाख राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कृषी विभाग उत्पादनाची अंतिम आकडेवारी सादर करण्यापूर्वी सर्व हंगामाच्या उत्पादनाची आकडेवारी सादर करतं. त्यानुसार यंदा रब्बी हंगामातील पिकांची कापणी सध्या जोरात सुरु असल्याचं यात म्हटलं आहे.

तिसऱ्या सुधारित अंदाजानुसार, अन्न-धान्याचं एकूण उत्पादन 27 कोटी 33 लाख टन इतकं होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी देशात 25 कोटी 15 लाख टन उत्पादन झालं होतं. तर त्यापूर्वी 2013-14 मध्ये 26 कोटी 50 लाख टन विक्रमी उत्पादन झालं होतं.

अन्नधान्यांमध्ये तांदूळ, गहू आणि डाळींच्या पिकांचा समावेश आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात, 2016 या वर्षात पर्जन्यमान चांगले राहिल्याने, तसंच सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे देशात पिकांचं विक्रमी कृषी उत्पादन होत असल्याचं म्हणलं आहे.