ठाणे : ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली त्यांचा तुम्ही विश्वासघात केला, निवडणुका घ्या मग जनताच तुम्हाला जागा दाखवेल असा थेट हल्लाबोल ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मी संघर्ष करणार असा निर्धार ठाण्याचे (Thane)  खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केला.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांची शिवसेना नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने ठाण्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर राजन विचारे बोलत होते.


शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार


कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार राजन विचारे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आज माझी शिवसेना नेते म्हणून निवड केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यानी जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठे ही तडा लागणार नाही. एका सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, दोनदा खासदार ही संधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत हा माझा संघर्ष आहे. जोपर्यंत भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालू राहणार. 


ठाण्यातील असंख्य शिवसैनिक या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी उभे आहेत, युवा सैनिक आणि महिला पदाधिकारीही उभे आहेत असं सांगत शेवटच्या श्वासापर्यंत आपला संघर्ष सुरू राहणार असं राजन विचारे म्हणाले.  


निवडणुका घ्या, जनता तुमची जागा दाखवेल


खासदार राजन विचारे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "ज्या ताटाखाली खाल्लं त्या ताटाखाली घाण करायला निघाले. तुम्ही ज्यांच्यामुळे नगरसेवक, आमदार, मंत्री झाला त्यांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि तुम्ही विश्वासघात केला. निवडणुका घ्या, महाराष्ट्रातली जनता तुमची जागा दाखवेल."


मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना राजन विचारे म्हणाले की, मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता आरक्षणासाठी आंदोलन करत होता आणि पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. त्या ठिकाणी गोळीबारही केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्याचं उत्तर देणार. 


ही बातमी वाचा: