Dombivli Blast News : डोंबिवली पूर्वेतील MIDC मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (dombivli blast) झाला. स्फोटामुळे डोंबिवली अन् आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट (boiler blast in dombivli) इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. इतकंच नाही तर या स्फोटामुळे (dombivli midc blast) डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटेनीच दखल घेतली असून तात्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत. अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तीन तासानंतरही हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात येत नाही.

  



आठ जण जखमी - 


डोंबिवली पूर्वेतील केमिकल कंपनीचा बॉयलर फुटल्यामुळे लागलेली भीषण आग तीन तासानंतरही अजूनही आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत आठ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे. जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 


जवळच्या तीन कंपन्यांनाही लागली आग ? 


अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. बॉयलर्सचे तुकडे दीड किलोमीटर अंतरावर पडलेत, सगळ्या सोसायट्यांमधील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, अशी माहिती स्थानिक प्रत्यदर्शींनी दिली आहे. इतकेच नाही तर स्फोटानंतर ही आग जवळच्या तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. या दुर्देवी घटनेतील जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 



 भूकंप आल्याप्रमाणे लोकांची धावपळ - 


केमिकल कंपनीमध्ये दुपारी एक सव्वा एकच्या आसपास स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर जवळच्या कंपन्यांनाही आग लागल्याचं समोर आले. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. आजूबाजूलाही काही दिसत नव्हते. या स्फोटामुळे दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.


सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अग्निशामन केंद्राकडून देण्यात आली. 



सदर घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहने पुढीलप्रमाणे:-
१) एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
२) डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
३) कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
४) कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
५) पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
६) ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत. 
७) ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मदतीसाठी TDRF चे 13 जवानांची टीम रवाना



देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 


डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेय.


2016 मध्ये प्रोबेस कंपनीत नेमकं काय घडलेलं? 


ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये असलेल्या प्रोबेस कंपनीत 2016 मध्ये भीषण अपघात झालेला. डोंबिवलीतील पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटानं पुरता हादरुन गेला होता. या स्फोटात तब्बल 12 जण दगावले होते. तर, तब्बल 183 जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीत झालेला हा केमिकल स्फोट इतका शक्तिशाली होता की, कंपनीची इमारत जमीनदोस्त झाली होती. ज्याठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी 10 फुटांचा खोल खड्डा पडला होता. याव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर कंपन्यांच्या इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.