Kalyan News : कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी (Hysterolaparoscopy) खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समजेल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.


हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु असताना अचानक प्रकृती बिघडली आणि तासाभरात मृत्यू  


विक्रोळी इथे राहणाऱ्या पूजा लोखंडे यांना मूल होत नसल्याने उपचारासाठी त्या कल्याण इथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. त्यांच्यावर कल्याण अॅपेक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी (11 ऑगस्ट) सकाळी पूजा लोखंडे या आपल्या आईसोबत रुग्णालयात आल्या. सकाळी त्यांची हिस्ट्रोलेप्रोस्कोपी होणार होती. त्यासाठी सकाळीच पूजा रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला. 


डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप


पूजा यांचा मृत्यू झाल्याचं कळताच तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप केला. नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. नातेवाईकांच्या गोंधळानंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.


डॉक्टरांनी आरोप फेटाळले


दुसरीकडे रुग्णालयातील डॉ मानसी घोसाळकर यांनी मात्र पूजा लोखंडे यांचे आरोप फेटाळले आहे. संबंधित महिलेवर हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु होती. याच दरम्यान तिची प्रकृती खालावली. तिला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समोर येईल, असं डॉ. मानसी घोसाळकर म्हणाल्या.


कळवा हॉस्पिटलमध्ये एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू,


ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात, आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आव्हाड यांना संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले. 


हेही वाचा


Kalyan : मुलाच्या हव्यासापोटी चार वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार; आठ तासातच पोलिसांनी घेतला मुलाचा शोध